
नागपूर : विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, त्यानंतर पाच डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. दरम्यान, आज अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. नागपुरात नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला, यावेळी भाजपच्या सर्वाधिक १९ मंत्र्यांनी शपथ घेतली, तर शिवसेना शिंदे गटाच्या ११ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात आज ३९ मंत्र्यांना राज्यपाल सी.पी राधाकृष्ण यांनी पद आणि गोपनेतेची शपथ दिली. महायुतीतील एकूण ३३ आमदारांनी कॅबिनेट तर सहा आमदारांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वात आधी शपथ घेतली. त्यानंतर, आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी आमदारांनी शपथ दिली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह वरिष्ठ नेते, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, या नव्या मंत्रिमंडळाचं वैशिष्ट म्हणजे या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तब्बल २० नवीन चेहऱ्यांना फडणवीस सरकार मध्ये संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये भाजपमधून नऊ चेहऱ्यांना तर शिवसेना शिंदे गटातून सहा राष्ट्रवादी अजित पवार गटातून पाच नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे काही अनुभवी नेत्यांचा पत्ता कट झाला आहे. ज्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाहीये, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांची देखील मंत्रिपदाची संधी हुकली आहे. भाजपकडून रवींद्र चव्हाण यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.
नागपूरमध्ये शपथिवधी सोहळ्यात भाजपकडून प्रथम क्रमांकाची शपथ भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून हसन मुश्रीफ यांनी पहिल्यांदा शपथ घेतली, तर शिवसेना शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील यांनी पहिल्यांदा मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे महायुती सरकारमध्ये भाजपमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर बावनकुळे वरिष्ठ नेते असतील. राष्ट्रवादीमध्ये हसन मुश्रीफ, तर गुलाबराव पाटील हे शिंदे सेनेमध्ये नेते असतील.
फडणवीस सरकार मध्ये या मंत्र्यांनी घेतली शपथ
मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्यांत चंद्रशेखर बावनकुळे नागपूर, राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी, हसन मुश्रीफ कोल्हापूर, चंद्रकांत पाटील पुणे, गिरीश महाजन जळगाव, गुलाबराव पाटील जळगाव, गणेश नाईक नवी मुंबई, दादा भुसे नाशिक, संजय राठोड यवतमाळ, धनंजय मुंडे बीड, मंगलप्रभात लोढा मुंबई, उदय सामंत कोकण, जयकुमार रावल धुळे, पंकजा मुंडे बीड, अतुल सावे छ.संभाजीनगर, अशोक उईके यवतमाळ, शंभूराजे देसाई सातारा, आशिष शेलार मुंबई, दत्तात्रय भरणे पुणे, आदिती तटकरे रायगड, शिवेंद्रसिंह राजे भोसले सातारा, माणिकराव कोकाटे नाशिक, जयकुमार गोरे सातारा, नरहरी झिरवाळ नाशिक, संजय सावकारे भुसावळ, संजय शिरसाट छ. संभाजीनगर, प्रताप सरनाईक ठाणे, भरत गोगावले रायगड, मकरंद जाधव पाटील सातारा, नितेश राणे कणकवली, आकाश फुंडकर बुलढाणा, बाबासाहेब पाटील लातूर, प्रकाश आबिटकर कोल्हापूर यांनी कॅबिनेट मंत्र्यांची शपथ घेतली. तर राज्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्यांत माधुरी मिसाळ पुणे, आशिष जैस्वाल रामटेक नागपूर, पंकज भोयर वर्धा नागपूर, मेघना बोर्डीकर परभणी, इंद्रनील नाईक, पुसद, यवतमाळ योगेश कदम रायगड यांनी शपथ घेतली आहे.
फडणवीस मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाचे वर्चस्व
देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा आज झालेल्या विस्तारामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाचे वर्चस्व दिसून आले आहे. या विभागातील 19 मंत्र्यांनी आज शपथ घेतली आहे. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील १० तर विदर्भातील ९ मंत्र्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर मधून येतात. इतर विभागामधून ठाणे- कोकणातून ८ तर उ. महाराष्ट्राचे ७ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. मराठवाड्याचे ६ तर मुंबईतले फक्त २ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे.