
देवेंद्र फडणवीस : जलसंधारणाच्या माध्यमातून अवर्षणग्रस्त भागाचा प्रश्न मार्गी लागेल
#पुणे : शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा गंभीर मुद्दा आहे. या आत्महत्या रोखण्यासाठी पाणी प्रश्न मार्गी लावणे आवश्यक आहे. राज्यात ५० टक्के पाण्याची कमतरता आहे. जलसंधारणाच्या माध्यमातून अवर्षणग्रस्त भागाचा प्रश्न सोडविला जाऊ शकतो असे मत माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केले.
भारतीय जैन संघटनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध अभिनेते आणि पानी फाउंडेशनचे विश्वस्त आमिर खान, सत्यजित भटकळ, आमदार चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, योगेश टिळेकर, हेमंत रासने, प्रशांत बंब, परिणय फुके, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथा उपस्थित होते.
यावेळी फडणवीस म्हणाले, ‘२०२० मध्ये केंद्र सरकारने एक पाणी सारणी अहवाल तयार केला होता. देशामधील जवळपास सर्वच राज्यांमधील पाण्याची पातळी खाली गेल्याचे त्यामध्ये समोर आले होते. केवळ महाराष्ट्रामध्ये पाण्याची पातळी वाढलेली दिसत होती. जलसंधारण क्षेत्रात पानी फाउंडेशन आणि भारतीय जैन संघटना चांगले काम करत आहेत. ‘आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, असे म्हणत मी कार्यकर्ता म्हणून तुमच्याबरोबर आहे.’ असे ते म्हणाले.
जलसंधारण हा केवळ एका समाजाचा कार्यक्रम नाही, तर भारताच्या ‘जीडीपी’चा (सकल राष्ट्रीय उत्पादनाचा) आहे. देशाला आर्थिक महासत्ता करण्याचा रस्ता जैन समाजाच्या मार्गानेच जातो. जैन समाज दातृत्वामध्ये अग्रणी आहे. नि:स्वार्थ सेवा हा गुण आहे. केवळ सरकारवर अवलंबून न राहता आपणही याविषयी काम करायला हवे या विचार मनात ठेवून भारतीय जैन संघटना आणि पानी फाउंडेशनने जलसंधारणामध्ये काम केले आहे. मानवी बुद्धिमत्तेचा वापर आपण करणार नसू तर, कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग होणार नाही. सज्जनशक्तीच्या पाठीशी राहणे हे कर्तव्यच नाही तर जबाबदारी आहे, या भावनेतून कार्यक्रमाला उपस्थित असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
शरद पवार काय म्हणाले?
जल, जंगल आणि जमीन या क्षेत्राकडे सध्या लक्ष देण्याची गरज आहे. यातून देशातील बहुतांश समस्या दूर होतील. त्यामुळे भारतीय जैन संघटनेने यात काम करावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केली. देशात समस्या आली त्यावेळी जैन समाजाने ती समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला, अशा शब्दांत त्यांनी भारतीय जैन संघटनेच्या कार्याचा गौरव केला. भारतीय जैन संघटनेच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी शरद पवार बोलत होते. यावेळी नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सकल जैन समाज संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय दर्डा, संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथा, उद्योजक प्रकाश धारिवाल, गणपत चौधरी, विठ्ठल मणियार, जितोचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी, राजेंद्र लुंकड, वालचंद संचेती, राजेश मेहता, वल्लभ भन्साळी, डॉ चैनराज जैन, कोमल जैन, सरला मुथा या वेळी उपस्थित होत्या.
पानी फाउंडेशनच्या कामाला फडणवीस यांनी प्रोत्साहन दिले. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी या क्षेत्रात आणखी काम करण्याची संधी मिळाली आहे.
-आमिर खान, प्रसिद्ध अभिनेते आणि पानी फाउंडेशनचे विश्वस्त