कॉपीमुक्त परीक्षेसाठी शिक्षण विभागाचा निर्णय ; एचएससी-एसएससी बोर्डाचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (एचएससी-एसएससी बोर्ड) घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी, बारावीची अंतिम परीक्षा फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. या परीक्षेत कोणताही गैरप्रकार घडू नये. कॉपीमुक्त परीक्षेसाठी विशेष काळजी माध्यमिक शिक्षण विभागाकडून घेतली जात आहे. ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही आहेत; त्यांनाच परीक्षा केंद्र म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
राज्यभरात कॉपीमुक्त राबविण्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून आतापासूनच तयारी सुरू झाली आहे. बोर्डाच्या या परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही आहेत; त्यांनाच परीक्षा केंद्र म्हणून मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय केंद्रावरील हालचाली टिपण्यासाठी येथे व्हिडिओ शूटिंग केले जाणार असून, त्यासाठी शिक्षण विभागात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.
शरद गोसावी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (एचएससी-एसएससी बोर्ड) म्हणाले, ” दहावी, बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या परीक्षेत कोणताही गैरप्रकार घडू नये. कॉपीमुक्त परीक्षेसाठी विशेष काळजी माध्यमिक शिक्षण विभागाकडून घेतली जात आहे. त्या अनुषंगाने परीक्षेदरम्यान मोबाइलद्वारे किंवा अन्य माध्यमातून होणारी पेपरफुटी रोखण्यासाठी विविध पर्याय अवलंबिले जात आहेत. प्रत्येक वर्गातील गैरप्रकार रोखण्यासाठी दहावी- बारावीच्या परीक्षेचे आता सीसीटीव्हीत रेकॉर्डिंग होणार आहे. परीक्षेच्या केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक आहेत. यासह परीक्षा केंद्रांच्या परिसरात व प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही आहेत का? लाइट गेली तर जनरेटर किंवा अन्य पर्याय आहे का? मुबलक पाणी, अशा सर्व सोयी-सुविधा आहेत की नाहीत, याची पडताळणी करण्यात आली आहे.”
शिक्षण विभागात वॉररुम
इतकेच नाही तर परीक्षा केंद्रावरील सहायक परीक्षकांच्या मोबाइलवरून प्रत्येक केंद्रावरील पेपर संपेपर्यंत हालचाली टिपण्यात येणार आहेत. तसेच केंद्रांवरील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी शिक्षण विभागात वॉररूम तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त गर्दी केंद्रावर दिसल्यास, परीक्षा केंद्रात पर्यवेक्षकांनी फेऱ्या न मारता एकाच ठिकाणी उभे राहिल्यास, विद्यार्थ्यांनी बैठक व्यवस्थेत बदल केल्यास, गैरप्रकाराच्या हालचाली झाल्यास तत्काळ शिक्षण विभागात तयार करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाला कळणार आहे.
निकाल लागेपर्यंत फुटेज करावे लागणार जतन
कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डाने यापूर्वी काही पद्धतीचा अवलंब केला. मात्र परीक्षेदरम्यान अनेक केंद्रांवर कॉपी करण्याचे प्रकार आढळले आहेत. आतापर्यंत केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे व वीज गेल्यास जनरेटर असल्याचे लेखी स्वरूपातच दिले जायचे. परंतु, प्रत्यक्षात काहीच नसायचे. मात्र, आता शासनानेच त्या संदर्भातील आदेश काढत प्रत्येक शाळेत विशेषत: बोर्ड परीक्षेच्या केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक केले आहे. नुसतेच सीसीटीव्ही नाही, तर त्याचे फुटेज साठवून ठेवण्याचीही सोय आवश्यक आहे. परीक्षा संपून निकाल लागेपर्यंत ते फुटेज संबंधित केंद्र चालकांना जतन करून ठेवावे लागणार आहे.