
बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री भूमी पेडनेकरला नेमका कसा ‘जोडीदार’ हवाय याबाबत तिनेच माहिती दिलीय. एका मुलाखतीमध्ये तिने प्रेम, डेटिंग आणि लग्नाबाबत बेधडक मते मांडतानाच आपल्याला बाह्य अकर्षणात रस नसून जोडीदाराचे व्यक्तीमत्व अधिक महत्वाचे असते असे ती म्हणाली. कपडे किंवा गाड्यांमधून माणसाची योग्यता ठरत नसून, माणसाच्या मन आणि विचारांमधून ती दिसते.
भूमी म्हणाली की तिच्यासाठी आपला जोडीदार संवेदनशील आणि इतरांनाचा आदर करणारा असावा. तिच्या अपेक्षेप्रमाणे योग्य असलेल्या जोडीदाराच्या शोधात ती असल्याचे म्हणते. मात्र, लग्नाची कोणतीही घाई नाही. योग्य जोडीदार मिळाल्यानंतर लग्न करू. त्यासाठी कितीही वर्षे लागली तरी माझी थांबण्याची तयारी असल्याचे ती म्हणाली.
ती म्हणते, की माझ्या जोडीदाराने माझ्या कामाचा आदर केला पाहिजे. तिच्या यशात आनंद मानला पाहिजे. संवेदनशीलतेचा केवळ दिखावा न करता त्याने मनापासून चांगला माणूस असणे आवश्यक असल्याचे ती म्हणते.
आपण स्वत:वर प्रेम करायला शिकले पाहिजे. आपले स्वत:शीच कसे नाते आहे हे आपण पाहायला हवे. स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही जसे आहात तसेच रहा. डेटिंगबाबत बोलताना तिने संयम बाळगण्याचा सल्ला दिलाय. योग्य व्यक्तीला शोधायला वेळ लागू शकतो, पण एकदा तो सापडला की सर्व प्रतीक्षा सार्थकी लागेल, असे ती म्हणाली.