
मुंबई : मुंबईमधील कुर्ला परिसरात बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ४९ जण जखमी झाले आहेत. काळजाचा थरकाप उडविणाऱ्या या अपघातामुळे बेस्ट बसेसच्या देखभाल-दुरूस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बेस्टच्या भरधाव बसने सोमवारी रात्री कुर्ला परिसरात अनेकांना चिरडले होते. अपघातानंतर कुर्ला परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
काही मृतांची ओळख पटली असून यातील तिघांची अफजल रसूल (वय १९), आझम शेख (वय २०), कानिफ कादरी (वय ५५), शिवम काशिम (वय १८) अशी आहेत. बसचालक संजय मोरे याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी कुर्ला पश्चिम परिसरात रात्रभर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तसेच, कुर्ला पश्चिम येथील बेस्ट आगार देखील बंद ठेवण्यात आले होते.
कुर्ला पश्चिम येथील महापालिकेच्या एल विभाग कार्यालयाजवळ हा अपघात घडला. बेस्टची बस कुर्ला पश्चिम येथून अंधेरीला निघालेली होती. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित बस रस्त्यावरून जाणाऱ्या काही खासगी वाहनांसह रिक्षाला धडक देत पुढे गेली. त्यानंतर, अनेक पादचाऱ्यांना धडक देत ही बस पुढे जाऊन भिंतीवर जाऊन आदळली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत कार्य सुरू करीत सर्व जखमींना महापालिकेच्या भाभा रुग्णालय तसेच अन्य खासगी रुग्णालयांमध्ये हलवले.