
पेन्सिल बॉक्स भरण्याचे काम देण्याच्या नावाखाली लावला गंडा
पुणे : पुण्यातील एका महिला गृहउद्योग समूहाने पुर्व हवेलीतील लोणी काळभोरसह उरुळी कांचन, भेकराईनगर व परिसरातील हजारो महिलांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तर, या फसवणुकीची व्याप्ती अजूनही वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांची फसवणुक करण्यासाठी नवनवीन प्रकार, युक्त्या अंमलात आणल्या जातात, त्यात आता या नवीन प्रकाराची भर पडली आहे.
या उद्योग समूहाची सासवड, भेकराईनगर, पिंपरी चिंचवड, सोलापूर व पंढरपूर या ठिकाणी चार मुख्य कार्यालये आहेत. तर हडपसरसह उरुळी कांचन परिसरात वस्तू वाटप करण्याची छोटी कार्यालये आहेत. या उद्योग समूहाने हजारो महिलांना पेन्सिल बॉक्स भरण्याचे काम देण्याचे आमिष दाखवून गंडा घातला आहे. आपल्याला रोजगार मिळणार व त्यातून आपल्या कुटुंबाची आर्थिक उन्नती होईल या भावनेने अनेक महिला या उद्योग समूहाकडे आकर्षित झाल्या असून त्यांनी या समूहाचे सभासदत्व स्वीकारले आहे.
काही तास काम केल्यानंतर दररोज दोनशे रुपये मिळणार या आशेने काही महिलांनी एक, तर काही महिलांनी दोनहून अधिक सभासत्व स्वीकारले आहे. यासाठी उद्योग समूहाने प्रत्येक महिलेकडून २ हजार ५० रुपये घेतले आहे. यामध्ये ५०० रुपये कंपनीची फी, ५० रुपये फॉर्म फी आणि डिपॉझिट म्हणून १ हजार ५०० रुपये घेण्यात आले आहेत. काम सोडल्यानंतर आठ दिवसानंतर. डिपॉझिटचे १हजार ५०० रुपये परत दिले जाणार आहेत. तसेच या उद्योगसमूहाला दर शनिवारी साप्ताहिक सुट्टी असल्याचे उद्योग समूहाच्या सुपरवायझरने सांगितले होते.
घरबसल्या काम करुन चार पैसे हातात मिळतील या भावनेने लोणी काळभोर व उरुळी कांचन येथील महिला सदर उद्योग समूहाच्या सभासद झाल्यानंतर त्यांनी उरुळी कांचन येथील छोट्या वाटप केंद्रातून १ हजार पेन्सिल पॅक करण्यासाठी घेतल्या. प्रत्येक बॉक्समध्ये १० पेन्सिल याप्रमाणे १०० बॉक्स तयार केले. त्यानंतर बॉक्सवर लेबल लावून महिलांनी पुन्हा हे बॉक्स ऑफिसमध्ये जमा केले.
प्रतिमहिना चार ते साडेचार हजार रुपये मिळणार असल्यामुळे महिलाही खुश झाल्या होत्या. परंतु उद्योग समूहाने बनवलेल्या मोहाच्या जाळ्यात त्या पूर्णपणे फसल्या. सुरुवातीचे चार-पाच दिवस महिलांना वेळेवर वस्तू मिळाल्या. त्यानंतर त्यांना वस्तू मिळाल्या नाहीत. त्यावेळी सुपरवायझरकडून आज माल आला नाही, कार्यालयाला सुट्टी आहे, उद्या या अशी वेळोवेळी वेगळी कारणे सांगण्यात येऊ लागली. महिलांना माल मिळत नसल्याने त्यांनी आपले पैसे परत मागण्याचा तगादा लावला. तेव्हा या उद्योग समूहाने मागील काही दिवसांपासून ऑफिस उघडले नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे महिलांची मोठी आर्थिक फसवणूक झाली आहे.
एखादा गृहउद्योग समूह महिलांची अशी फसवणूक करीत असेल, तर हे एक दुर्दैवच म्हणावे लागेल. तसेच या घटनेत महिलांच्या फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महिलांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी अशा प्रकारच्या फ्रॉडपासून सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे. या प्रकरणी कोणत्याही महिलेने पुढे येऊन तक्रार न दिल्याने अद्यापही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी महिला गृहउद्योग समूहाच्या अध्यक्षांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचा फोन बंद असल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही. मात्र, त्यांचा फोन गेल्या १५ दिवसांपासून बंद असून ते गायब झाल्याची माहिती मिळत आहे.
उरुळी कांचन येथील ५०० पेक्षा जास्त महिला या गृहउद्योग समूहात सहभागी झाल्या आहेत. यामध्ये फसवणूक होत आहे, असे लक्षात आले नंतर त्यांनी त्वरित पैसे मागण्यास सुरुवात केली. त्यातील काही महिलांना पैसे परत मिळाले आहेत. मात्र, भरपूर महिला यामध्ये अडकल्या आहेत. शासनाने फसवणूक करणाऱ्या या गृहउद्योग समूहावर कडक कारवाई करावी.
फसवणूकग्रस्त महिला (उरुळी कांचन, ता. हवेली)