
नवी दिल्ली : बांगलादेशमध्ये सध्या राजकीय आणि सामाजिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना आणि मोहम्मद यूनुस यांच्यातील वाद चिघळत चालला आहे. न्यूयॉर्कमध्ये आयोजित एका वर्चुअल कार्यक्रमात बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी मोहम्मद यूनुस यांच्यावर ‘सामूहिक हत्यांचे मास्टरमाइंड’ असल्याचा गंभीर आरोप केला. हा आरोप बांगलादेशमध्ये अल्पसंख्यक समुदायावर होणाऱ्या हल्ल्यांच्या संदर्भात केला गेला आहे.
शेख हसीना यांनी काय केले नेमके आरोप
हसीना यांनी आरोप केला की मोहम्मद यूनुस यांनी अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू समुदायाच्या मंदिरे, इस्कॉनची उपासना स्थळे आणि इतर धार्मिक स्थळांवर हल्ल्यांची कटकारस्थाने रचली. अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये मोहम्मद यूनुस आणि त्यांच्या समर्थकांचा सहभाग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शेख हसीना यांच्या मते, मोहम्मद यूनुस त्यांच्या विद्यार्थी सहकारी असे सर्वच जण या सामूहिक हत्यांसाठी जबाबदार आहेत. हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध समुदायांच्या धार्मिक स्थळांवर हल्ले होत असल्याचे हसीना यांनी सांगितले. मंदिरे आणि चर्चांनाही लक्ष्य केले जात आहे.
सद्यस्थिती नेमकी काय आहे?
बांगलादेशातील अंतरिम सरकारवर अल्पसंख्यांकांवर भेदभाव केल्याचे, त्यांच्या घरांना आणि धार्मिक स्थळांना सुरक्षा पुरवण्यात अपयशी ठरल्याचे आरोप होत आहेत.
पुजारी चिन्मय कृष्ण दास यांची अटक
ढाका येथील शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुजारी चिन्मय कृष्ण दास यांना अटक करण्यात आली, तेव्हा ते चटगाव येथे एका रॅलीत सहभागी होण्यासाठी जात होते. शेख हसीना यांनी या अटकेचा निषेध केला असून, पुजारी चिन्मय कृष्ण दास यांची तातडीने सुटका करण्याची मागणी केली आहे.
सत्तांतरानंतरची परिस्थिती
– ५ ऑगस्ट २०२३ रोजी शेख हसीना यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर अल्पसंख्यांक समुदायावर हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. धार्मिक स्थळांवर हल्ल्यांचे वृत्तही वारंवार समोर येत आहे. ही परिस्थिती बांगलादेशातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र करत असून, यावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा होणे आवश्यक ठरत असल्याचे शेख हसिना म्हणाल्या.