
माजी पोलीस अधीक्षक के. एम. एम. प्रसन्ना, तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांना २ लाख रुपयांचा दंड
#सातारा : महाराष्ट्र केसरी पैलवान संजय पाटील (रा. आटके, कराड) यांच्या हत्येप्रकरणाचा तपास करणाऱ्या तत्कालीन पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांना चुकीच्या पद्धतीने अटक केल्याप्रकरणी माजी पोलीस अधीक्षक के. एम. एम. प्रसन्न व तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांना २ लाख रुपयांचा (एकूण) दंड ठोठावला आहे. याबाबतचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एस. चांदूरकर व राजेश पाटील यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
संभाजी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिलवान संजय पाटील यांचा १५ जानेवारी २००९ रोजी मलकापूर (ता. कराड) येथे खून झाला. तत्कालीन पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांनी या गुन्ह्यात ८ आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर पोलीस निरीक्षक मुरलीधर मुळूक व पोलीस उपअधीक्षक भारत तांगडे यांनी गुन्ह्याचा अधिक तपास केला.
मात्र तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक अमोल तांबे व पोलीस निरीक्षक के.एम.एस प्रसन्ना यांनी अधिक तपासाचा आदेश देत न्यायालयीन निर्णय होण्यापूर्वी पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांना मार्च २०१३ मध्ये अटक केली. त्यानंतर कराड न्यायालयाने संभाजी पाटील यांचा जामीन मंजूर केला. ३० मार्च २०१३ पासून संभाजी पाटील यांनी तत्कालीन पोलीस महासंचालक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अटक व तपासाबाबतचे लेखी अर्ज केले.
दरम्यान या खटल्याच्या सुनावणीत न्यायालयाने संभाजी पाटील यांचा लेखी व तोंडी युक्तिवाद मान्य करून, त्यांच्यावरील अटकेची कारवाई बेकायदा असल्याचे स्पष्ट केले. त्यांना ८ आठवड्यात नुकसान भरपाई म्हणून २ लाख रुपये देण्याचा आदेशही शासनाला दिला आहे.
या निकालावर बोलताना संभाजी पाटील म्हणाले, “तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्याविरुद्ध कोणताही पुरावा नसताना, बेकायदेशीररित्या अटक केली. जामिनाची मागणी केल्यानंतरही जामीन दिला नव्हता. त्यामुळे माझ्या उर्वरित सेवेत व कौटुंबिक पातळीवर फार मोठे नुकसान झाले. मी ११ वर्षांपेक्षा अधिक काळ याप्रकरणी न्यायालयात लढा दिला. अखेर, मला न्याय मिळाला, त्याबाबत समाधानी आहे.”