
डिसेंबरमध्ये थंडीऐवजी वाढू लागले तापमान
हवामान बदलामुळे वाढणार आजारांचा धोका
नवी दिल्ली : सामान्यतः थंड मानल्या जाणाऱ्या डिसेंबर महिन्यात उत्तर-पश्चिम थंड वाऱ्यांच्या कमतरतेमुळे उष्णतेचा प्रभाव वाढला आहे. परिणामी, बंद असलेले पंखे आणि एसी पुन्हा सुरू झाले आहेत.
भारताच्या विविध राज्यांमध्ये अनेक भागांत डिसेंबर महिन्यात थंडीऐवजी उष्णतेचा अनुभव येत आहे. काही ठिकाणी तापमान सामान्यपेक्षा 3-4 अंशांनी जास्त नोंदवले जात आहे, ज्यामुळे नागरिक अचंबित झाले आहेत. हिवाळ्याच्या या महिन्यात थंडीच्या वाऱ्यांमध्ये झालेल्या घटमुळे उष्णतेचा प्रभाव अधिक जाणवतो आहे.
आरोग्यावर होणार विपरीत परिणाम
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, डिसेंबरमधील असामान्य तापमान आरोग्य समस्यांना वाढवू शकते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आधीच आरोग्यदृष्ट्या कमकुवत असलेल्या व्यक्तींना याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, अशा प्रकारच्या उष्ण हवामानामुळे उष्णताजन्य आजार होऊ शकतात. उष्णतेमुळे फ्लुइड लॉस होत असल्याने हीट स्ट्रोक आणि इतर आजारांची शक्यता वाढते. याशिवाय, उष्ण हवामान मच्छरांच्या प्रजननासाठी पोषक ठरत असल्याने डेंग्यू आणि मलेरियाचा धोका वाढतो.
हवामान आणि वायूप्रदूषणाचा प्रभाव
वरिष्ठ पल्मोनोलॉजिस्ट्सच्या मते, वायूप्रदूषण आणि हवामान बदलांमुळे सर्दी कमी तर उष्णता अधिक जाणवत आहे. अशा हवामानामुळे नाक-घशाच्या ऍलर्जी, डोळ्यांत जळजळ, आणि श्वसनविकार वाढले आहेत. विशेषतः ब्रॉन्कियल अस्थमा, सीओपीडी आणि इंटरस्टिशियल लंग डिसीजसारखे आजार जलद गतीने वाढत आहेत.
सावधगिरीचे उपाय
या काळात आरोग्याची नियमित तपासणी करणे महत्त्वाचे आहे. त्यांनी पोषणयुक्त आहार, पुरेशा प्रमाणात हायड्रेशन आणि वायूप्रदूषणापासून बचावासाठी मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे. उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी योग्य आहार, पुरेसे पाणी पिणे आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या.