
मुंबई : वांद्रे-सिप्झ मेट्रो ३ भुयारी मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामातील नवा भुयारी मार्ग विधानभवन आणि मंत्रालय यांची जोडणी जून २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहे. सध्या या भुयारी मार्गाचे २५ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम येत्या ६ महिन्यांत पूर्ण करणे अपेक्षित आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून कुलाबा-वांद्रे-सिप्झ या संपूर्णतः भुयारी मेट्रो मार्गिकचे काम सुरू आहे. विधानभवन ते मंत्रालय या भुयारी मार्गाच्या जोडणीसाठी न्यू ऑस्ट्रेलिअन टनेल पद्धतीने काम सुरू असून, यामुळे विधानभवनाची नवी प्रशासकीय इमारत जोडण्यात येणार आहे. मेट्रो ३ च्या बीकेसी ते कुलाबा या दुसऱ्या टप्प्यादरम्यान विधानभवन स्थानकाचा समावेश आहे. मात्र, या स्थानकातून मंत्रालय किंवा महत्त्वाची कार्यालये गाठण्यासाठी सातत्याने वाहतूक होत असल्याने रस्ते ओलांडण्याचा पर्याय टाळून भुयारी मार्गाच्या जोडणीचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रवाशांनाही रस्ता क्रॉसिंग करण्यापेक्षा थेट मंत्रालय गाठणे शक्य होणार आहे.
एमएमआरसीएलने दिलेल्या माहितीनुसार, स्थानके आणि भुयारांचे काम ९९.१ टक्के पूर्ण झाले असून, एकूण स्थानकांच्या बांधकामाचे ९७.६ टक्के काम पूर्ण झाले आहे, तर एकूण सिस्टिमचे काम ५८.७ टक्के, मुख्य मार्गिकेवरील ट्रॅक वर्क ९९.१ पूर्ण झाले आहे. तर ओसीएसचे काम ५७.१ टक्के पूर्ण झाले आहे. मेट्रो ३ च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होऊन महिना उलटून गेल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याची लगबग सुरू केली आहे. बीकेसी ते कुलाब्यादरम्यान गिरगावमधील भुयारी काम पूर्ण करणे अत्यंत आव्हानात्मक असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते, तर हिवाळी अधिवेशनातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्च २०२५ पर्यंत बीकेसी ते कुलाबा मेट्रो २ टप्पा सुरू करण्याबाबत शिक्कामोर्तब केले होते. त्यामुळे आता मेट्रो कामाबरोबर स्थानकांच्या जोडणीचे तसेच स्थानकातून बाहेर पडल्यानंतर मुख्य रस्त्याकडे जाणे प्रवाशांना सुलभ ठरावे, यासाठीच्या कामकाजाकडेही एमएमआरसीएलने लक्ष केंद्रीत केले आहे.