
#PimpriChinchwad : इंद्रायणी नदीत पोहूण धुलवड खेळणे तीन तरुणांच्या जीवावर बेतले आहे. धुलवडीनिमित्त इंद्रायणी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी (१४ मार्च) दुपारी साडे चारच्या सुमारास किन्हई गावच्या हद्दीत इद्रायणी नदीच्या पात्रात घडली.
गौतम कांबळे ( वय २४), राजदीप आचमे ( वय २५) आणि आकाश विठ्ठल गोरडे ( वय २४, सर्व रा. घरकूल, चिखली) अशी नदीत बुडून मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक विक्रम बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, धुलवड सण साजरा करण्यासाठी घरकूल येथिल चार ते पाच तरुण कन्हई गाव येथे गेले होते. सर्व तरुण पोहण्यासाठी इंद्रायणी नदीच्या पात्रात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने यातील तीन तरुण पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, रहिवासी, अग्निशमन दल, एनडीआरएफ घटनास्थळी पोहचले. काही वेळशोध घेतल्यानंतर पाण्यात तीनही तरुणांचे मृतदेह सापडले. पोलिसांनी याबाबत आकस्मित मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात पाठविले आहेत.
दरम्यान, घरकूल येथे राहणारे तरुण एकमेकांचे मित्र होते. ते धुलवड साजरी करण्यासाठी किन्हई गावात गेले होते. या सर्व तरुण कोणतेही काम किंवा नोकरी करत नव्हते. यांचे शिक्षणही सुरू नव्हते, असे बनसोडे यांनी सांगितले.
घरकूल येथील तीन तरुणांचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू झाला आहे. त्यांच्या आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यांनंतर पुढील तपास करण्यात येईल.– विक्रम बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक