
नागपूर : देशाच्या सेवेत संघाचे योगदान कोणालाही नाकारता येणार नाही. संघाची शिकवण जोडणारी आहे, तोडणारी नाही. असे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांची बोलताना नागपूरमध्ये म्हटले आहे.
नागपुरात राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे. अधिवेशनाचं कामकाज सुरू होण्याआधी महायुतीच्या आमदारांनी येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात हजेरी लावली. प्रथेप्रमाणे संघाने महायुतीच्या आमदारांना सकाळी ८ वाजता संघ मुख्यालयात आमंत्रित केलं होतं. यावेळी उपमु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर होते मात्र दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर राहिले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी संघाच्या कामकाजाचं कौतुक केलं. आपली सुरुवात देखील संघाच्या शाखेतूनच झाली असं सांगायलाही शिंदे विसरले नाहीत.
रेशीम बाग येथे मी पहिल्यांदा आलेलो नाही. यापूर्वी देखील आलो आहे. संघ आणि संघ परिवार यांच्याशी माझं नातं लहानपणापासूनचं आहे. संघाच्या शाखेतूनच माझी सुरूवात झाली. नंतर शिवसेनेच्या शाखा आणि शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि आनंद दिघे यांची शिकवण हे सुरू झालं असे एकनाथ शिंदे म्हणाले.
संघ परिवार आणि शिवसेना यांचे विचार एकसारखे आहेत. निरपेक्ष भावनेने कसे काम करावे हे संघाच्या संघ परिवाराकडून शिकावं. कोणत्याही प्रसिद्धिची अपेक्षा न ठेवता संघाचा स्वयंसेवक काम करतो. देशभरात संघाच्या ५ लाख शाखा आहेत. १९२५ रोजी संघाची स्थापना डॉ. हेडगेवार यांनी केली. पुढच्या वर्षी त्याला १०० वर्ष पूर्ण होत आहेत हे देखील विशेष आहे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
महायुती सरकारला मिळालेल्या प्रचंड बहुमतानंतर राज्याच्या मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस बसले याचा आनंद असल्याचेही शिंदे म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. मला आनंद आहे की ते देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. ते राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री झाले याचा आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे, त्यांच्या सहकाऱ्याला आहे.
इथे रेशीम बागेत आल्यानंतर प्रेरणा, ऊर्जा मिळते आणि पुढील काम करण्यासाठी बळ मिळतं. निरपेक्ष भावनेने समाजसेवा करणाऱ्यांनी जरूर एकदा तरी यावे आणि इथून प्रेरणा घेऊन जावी, असेही शिंदे यावे म्हणाले.