
मुंबई : राज्यातील पालकमंत्र्यांची बहुप्रतिक्षित यादी जाहीर झाली. या यादीनंतर वादाचा नवा धुरळा निर्माण झाला आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर तब्बल एक महिन्याने ही यादी जाहीर झाली. ही यादी तयार करताना महिनाभर महायुतीतील तीनही पक्षांचे नेते काथ्याकूट करीत होते. त्यामुळे यादी अंतिम झाल्यावर कोणताही वाद नसेल, अशी अपेक्षा होती; मात्र झाले उलटेच.
पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीचा आदेश १८ तारखेला शनिवारी जारी केल्यानंतर २४ तासांत त्यात बदल करण्याची व दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची नामुष्की सरकारवर ओढवली. रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यात पालकमंत्रिपदावरील नियुक्त्यांना स्थगिती देण्यात आली असली तरी अनेक जिल्ह्यात वाद धुमसत आहेत.
रायगड जिल्ह्यात पालकमंत्री पदासाठी शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले हे आग्रही होते; मात्र तटकरेंना हे पद देण्यात आल्यानंतर ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया उमटल्या त्या पाहता महायुतीत तीनही पक्ष मनाने सोबत नसल्याचे सिद्ध झाले. रायगड जिल्ह्यात सुनील तटकरे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष नेहमीच राहिला आहे. रायगड जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण ७ जागा आहेत. यापैकी प्रत्येकी तीन जागा शिवसेना व भाजपने जिंकल्या आहेत. राष्ट्रवादीच्या एकमेव आमदार अदिती तटकरे असून त्याच पालकमंत्री झाल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेचा संताप आणि आग्रह स्वाभाविक आहे. नाशिक जिल्ह्यात विधानसभेचे एकूण १५ मतदारसंघ आहेत. त्यापैकी ७ आमदार राष्ट्रवादीचे, ५ भाजपचे तर २ शिवसेनेचे आहेत. नाशिकमध्ये सर्वाधिक आमदार राष्ट्रवादीचे असल्याने त्यांना या पालकमंत्रिपद मिळावे, असा त्यांचा आग्रह होता; मात्र येथे पालकमंत्रिपद भाजपचे गिरीष महाजन यांना देण्यात आले. रायगडचे पालकमंत्रिपद मिळविण्याच्या मोबदल्यात राष्ट्रवादीने नाशिकवरील दावा सोडला असावा. पालकमंत्रिपदाच्या या वादावर तोडगा काढताना मुख्यमंत्री फडणवीस यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
कुंभमेळ्यामुळे नाशिकच्या पालकमंत्र्याला महत्त्व
शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यातील वादाचा भाजपने पुरेपूर लाभ भाजपने उचलत नाशिकचे पालकमंत्रिपद आपल्याकडे राखले आहे. २०२७ मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभ मेळा होत असल्याने पुढील तीन वर्षांत हजारो कोटी रुपये विकासकामांवर खर्च होणार आहे. त्यामुळे या जिल्ह्याचे पालकमंत्री अनेक अर्थाने महत्त्वाचे आहे.