
पोलिसांनी छत्तीसगडमध्ये कारवाई करीत केली अटक : ५० लाखांच्या खंडणीची केली होती मागणी
मुंबई : राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची मागील महिन्यात हत्या झाली होती. त्यानंतर, लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या नावाने अभिनेता सलमान खान याला धमक्या येत आहेत. अभिनेता शाहरुख खानला देखील ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तपासाला सुरुवात केली होती. पोलिसांनी छत्तीसगडमधून एका संशयिताला अटक केली आहे. त्याच्याकडे चौकशी सुरू करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांच्या वांद्रे पोलीस ठाण्यात एक आठवड्यापूर्वी फोन करून अज्ञात व्यक्तीने शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. फोन करणाऱ्या आरोपीने ५० लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. दरम्यान, तांत्रिक विश्लेषणामधून पोलिसांना महत्वाची माहिती हाती लागली. दरम्यान, एक पथक आरोपीच्या शोधासाठी रायपूरला रवाना करण्यात आले होते.
एप्रिलमध्ये सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाला होता. त्यानंतर त्याला ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. या हल्ल्यातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचा बिष्नोई टोळीशी संबंध अस्लयाचे उघड झाले आहे. सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानला २४ ऑक्टोबर रोजी बिश्नोई टोळीच्या नावाखाली ठार मारण्याची धमकी आली होती. त्याला मुंबई पोलिसांनी जमशेदपूरमधून अटक केली होती. या आरोपीने सलमानकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्यानंतर पोलिसांनी आता सलमान आणि शाहरुख खानच्या सुरक्षेत वाढ केली आहे.