
वेटरसोबत ग्राहकाचा वाद झाल्याच्या कारणावरून केला हल्ला
#पिंपरी-चिंचवड : हॉटेलमध्ये आलेल्या एका ग्राहकाचा वेटरसोबत वाद झाला. त्यानंतर चिडलेल्या हॉटेल मालकाने थेट कोयत्याने वार करीत ग्राहकाची हत्या केली. खळबळ उडवून देणारी ही घटना घडली आहे मावळ येथील इंदोरीमधील जय मल्हार हॉटेलमध्ये. याप्रकरणी हॉटेल मालकाला तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
प्रसाद उर्फ किरण अशोक पवार (वय २७, रा. कान्हेवाडी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, अभिषेक अशोक येवले (वय ३१, रा. कान्हेवाडी) हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी हॉटेल मालक अक्षय दत्तात्रय येवले (वय ३०, रा. कुंडमळा) याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवले याचे मावळमध्ये असलेल्या इंदोरी गावात जय मल्हार नावाचे हॉटेल आहे. याठिकाणी प्रसाद रात्री पावणे दहाच्या सुमारास गेला होता. त्याच्यासोबत त्याचा मित्र अभिषेक येवले हा देखील होता. त्यांचा वेटरसोबत हॉटेलमध्ये वाद झाला. या दोघांनी वेटरला मारहाण केली होते. संबंधित वेटरने हॉटेल मालक अक्षय येवलेला फोन करून मारहाण झाल्याचे सांगितले.
विशेष म्हणजे प्रसाद आणि अभिषेक हे दोघेही अक्षयचे मित्र आहेत. फोनवर अक्षयने प्रसाद आणि अभिषेक यांना भांडण करू नका, मी तिकडे येत आहे.’ असे सांगितले होते. त्यावेळी या दोघांनी फोनवरच त्याला देखील शिवी केली होती. त्यानंतर हे दोघे हॉटेलमधून निघून गेले. दरम्यान, काही वेळाने हे दोघे पुन्हा हॉटेलबाहेर आले. त्यांच्या हातामध्ये कोयता होता. अक्षय हॉटेल बंद करीत असतानाच या दोघांनी त्याच्यासोबत पुन्हा वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी अक्षयने त्याच्या हातातील कोयता काढून घेतला. त्यानंतर दोघांवर सपासप वार करण्यास सुरुवात केली.
या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना प्रसाद उर्फ किरणचा मृत्यू झाला. तर अभिषेकवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी अक्षयला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.