
#मुंबई : हेराफेरी या विनोदी सिनेमाने एक इतिहास घडवला. दोन पिढ्या या सिनेमाने पछाडल्या होत्या. त्यानंतर या सिनेमाचे सिक्वल देखील आले. त्यालाही प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला होता. आता प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे ती ‘हेराफेरी ३’ या सिनेमाची. या सिनेमाबाबत नेहमीच अनेक बातम्या येत असतात. एकेकाळी अक्षय कुमारने या कॉमेडी फ्रेंचाइजीमधून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. मात्र, नंतर परेश रावल आणि सुनील शेट्टी यांनी त्याच्या पुनरागमनाबाबत सकारात्मक संकेत दिले होते.
या सिनेमात तगडी ‘स्टारकास्ट’ होती. यातील प्रमुख भूमिकेत होते अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल. हे तीनही तगडे कलाकार पुन्हा एकत्र पाहण्यात आले आहेत. २००० साली प्रियदर्शन यांच्या दिग्दर्शनाखाली हेरा फेरी चित्रपटाची सुरुवात झाली होती. यामध्ये अक्षय कुमारने राजू हे पात्र साकारले होते. तर, सुनील शेट्टीने श्याम आणि परेश रावल यांनी सर्वांच्या पसंतीस उतरलेले बाबूराव हे मजेदार पात्र साकारले होते. या चित्रपटाला मोठं यश मिळालं होतं. त्यानंतर २००६ मध्ये आलेला ‘फिर हेरा फेरी’ हा सिक्वलही प्रचंड यशस्वी ठरला. आता तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. हेरा फेरीच्या या तिघांच्या फोटोने पुन्हा एकदा हेरा फेरी ३ च्या चर्चांना उधाण आलं. चाहत्यांना आशा आहे की हे तिघे लवकरच या आगामी चित्रपटासाठी तयारी सुरू करतील. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा होण्यास थोडा अवधी आहे.
फक्त हेरा फेरी फ्रेंचाइजीच नाही, तर अन्य कॉमेडी चित्रपटांमध्ये अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी हे त्रिकुट एकत्र आले होते. यामध्ये ‘दे दना दन’, ‘अवारा पागल दीवाना’, आणि ‘दीवाने हुए पागल’ यांसारख्या अनेक मजेदार चित्रपटांचा समावेश आहे. एवढंच नाही, तर येत्या काळात दिग्दर्शक अहमद खानच्या ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटातही हे त्रिकुट कॉमेडीचा तडका लावताना दिसणार आहे.