
Version 1.0.0
मुंबई : प्रचंड मताधिक्याने स्थापन झालेले राज्यातील महायुती सरकार स्थिरस्थावर होत असताना आता राज्यातील महापालिका निवडणुकीची चर्चा सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक येत्या दोन महिन्यांत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीचे राजकीय वर्तुळात पडघम वाजणे सुरू झाले आहे. त्यातच महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने स्वबळाची भाषा सुरू केली आहे. भाजप या निवडणुकीत जोर अजमावणार असल्याचे दिसत असून शिवसेनेच्या शिंदे गटाला ही भूमिका मान्य नाही.
महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढावी, असा सूर भाजपमध्ये उमटू लागला आहे. विधानसभा निवडणुकीतील प्रचंड यशाने भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या विरोधात लढताना भाजपला मुंबई महापालिकेत बरोबरीने यश मिळाले होते. त्यामुळे महायुती म्हणून लढण्यापेक्षा स्वतंत्र लढावे, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रस्तावित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत. चव्हाण यांनी शनिवारीही स्वबळाचा पुनरुच्चार केला. त्यामुळे महायुतीत अस्वस्थता निर्माण झाल्याचे स्पष्ट आहे.
भाजपमध्ये इच्छुक अधिक
भाजपमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यांची संख्या खूप मोठी आहे. लोकसभा आणि त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुकीत पक्ष शिस्तीच्या नावाखाली अनेक बंडखोरांना भाजपने रोखले. काहींना आश्वासने दिली गेली. त्यामुळे अशांच्या समर्थकांनाही निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची इच्छा आहे. महायुती म्हणून निवडणूक लढवल्यास कार्यकर्त्यांचा पुन्हा हिरमोड होईल, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मांडली होती. पण त्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचेही त्यांनी म्हटले होते.
शिंदे गटाला महायुती हवी
महापालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढवावी, अशी एकनाथ शिंदे यांच्या गटाची भूमिका आहे. शिंदे यांनी तसे जाहीररीत्या बोलून दाखवले आहे. मात्र, मुंबई आणि ठाण्याचे पालकमंत्रीपद असलेल्या शिंदे यांच्या शिवसेनेला पालिका निवडणूक एकाकी लढण्याची वेळ आली तर, हा प्रश्नसुद्धा नकोसा झाल्याचे दिसते. एकनाथ शिंदे यांच्या राज्यभर सुरू झालेल्या आभार सभा आणि त्यातील इशारे यामागे महापालिका निवडणुकीबाबत भाजपची भूमिकासुद्धा कारणीभूत असल्याची चर्चा आहे.
महाआघाडीची शकले
महाविकास आघाडीची आता शकले झाली असून शिवसेनेने पूर्वीच महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली. त्यामुळे मुंबई काँग्रेस अस्वस्थ आहे. महाआघाडी असल्यास शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आधाराने मुंबईच नव्हे तर राज्यातील पालिकांमध्ये चांगले यश मिळू शकते, हे काँग्रेस नेत्यांना माहिती आहे. मात्र, ठाकरे, शिंदे आणि भाजप स्वबळावर लढल्यास काँग्रेसचे पानीपत होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
घोडा मैदान जवळ
महापालिका निवडणुकाच नव्हे तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकीची घोषणा या वर्षाच्या सुरुवातीला होईल, असा अंदाज होता. मात्र, या निवडणुका मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शालेय परीक्षांचा हंगाम संपल्यानंतर उन्हाळा तीव्र होण्यापूर्वी निवडणुकीचे बिगुल वाजेल, अशी चर्चा आहे. दरम्यान, घोडा मैदान जवळ असल्यामुळे राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. स्वबळावर लढण्यास केवळ भाजप आणि शिवसेना (ठाकरे) यांनी उघड भूमिका घेतली असल्याचे दिसते.
राष्ट्रवादीची भूमिका गुलदस्त्यात
महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईतील राजकीय ताकद अत्यल्प आहे, तर राज्यात ठरावीक ठिकाणी कुठे अजित पवार तर कुठे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला यश मिळण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी दोन्ही गटांनी स्वबळाबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही.