
मुंबईच्या टर्मिनल-१ ची वाहतूक नवी मुंबई विमानतळाकडे, ऑक्टोबरपासून दिवसाला १५० उड्डाणे
मुंबई : मुंबईच्या सांताक्रूझचे देशी विमानतळ म्हणजेच टर्मिनल -१ ऑक्टोबरपासून जवळजवळ सव्वातीन वर्षे पुनर्विकास कामांसाठी बंद करण्यात येणार असून या टर्मिनलवरील विमानांची काही उड्डाणे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवली जाणार आहेत. याला जोडून आलेली आंनदवार्ता म्हणजे, येत्या एप्रिलमध्ये नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होणार असून मे महिन्यापासूनच येथील पहिली धावपट्टी सुरू होत असून ऑक्टोबरपासून दिवसाला १५० उड्डाणे नवी मुंबईतून सुरू होतील.
अधिकारी सूत्रांनी पुढारीला दिलेल्या माहितीनुसार हिवाळ्यातील विमान उड्डाण नवी मुंबई विमानतळावरून होतील असे नियोजन करण्याचे आदेश सर्व विमान वाहतूक कंपन्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार सध्या मुंबईच्या टी-१ आणि टी-२ या दोन विमानतळांवरून होणाऱ्या उड्डाणांपैकी काही उड्डाणे नवी मुंबई विमानतळावरून होतील आणि नवी मंबईचे उलवे हे नवे सुनियोजित उपनगर हवाई वाहतुकीच्या नकाशावर आलेले असेल. ऑक्टोबर ते मार्च हा थंडीचा हंगाम विमान कंपन्या नवी मुंबई विमानतळावर अनुभवतील.
नवी मुंबई विमानतळावरून सुरुवातीच्या काही महिन्यांत २० ते ३० लाख प्रवासी वाहतूक होईल असा अंदाज आहे. त्यामुळे राज्य सरकारने या विमानतळावर विमान इंधनावर आकारला जाणारा १८ टक्के मूल्यवर्धीत कर (वेंट) हा कमी करून नाममात्र एक टक्का आकारावा, असा प्रस्ताव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने राज्य सरकारला दिला आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, सांताक्रूझच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २०२४मध्ये ५५ दशलक्ष प्रवासी वाहतूक झाली. त्यापैकी एक पंचमांश प्रवासी वाहतूक नवी मुंबई विमानतळाकडे वळवली जाईल. टी-१ वरून होत असलेल्या १० दशलक्ष प्रवाशांची वाहतूक नवी मुंबईच्या टर्मिनल-१ कडे ऑक्टोबर अखेरीस वळवली जाईल आणि उर्वरित पाच दशलक्ष प्रवाशांची जबाबदारी टर्मिनल-२ वर टाकली जाईल. त्यासाठी टी-रची प्रवासी वहन क्षमता ४० दशलक्षवरून ४५ दशलक्ष केली जाणार आहे.
मुंबईचे टर्मिनल-१ ऑक्टोबर २०२५ पासून बंद होईल आणि संपूर्ण पुनर्विकास झाल्यानंतर १५ दशलक्ष ऐवजी २० दशलक्ष प्रवासी वहन क्षमतेसह हे टर्मिनल २०२९मध्ये पुन्हा सुरू होईल. तत्पूर्वीच २०२६च्या मध्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिलन-१ पूर्ण क्षमतेने सुरू झालेले असेल.
दृष्टिक्षेपात नवी मुंबई विमानतळ
बांधकामक्षेत्र ३ लाख चौरस मीटर
वर्षाला प्रवासी वहनक्षमता : २ कोटी
विमानतळ पूल : २९
रिमोट पार्किंग बेज : १३
एकावेळी ६७ विमानांचे पार्किंग
७ पार्किंग मालवाहू विमानांसाठी
१६ पार्किंग सर्वसाधारण विमानांसाठी
टर्मिनस
टी-१: मे २०२५ पासून सुरू
टी-२ : २०२९ पासून
टी-३ : २०३२ पासून
टी-४: २०३६ पासून
दोन समांतर धावपट्ट्या हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. मुंबईतील विमानतळावर या धावपट्ट्या एकमेकींना छेद देतात आणि म्हणून विमाने उतरताना आणि उडतानाही प्रतीक्षा करावी लागते. २ हजार ८६० एकरात उभारलेल्या नवी मुंबई विमानतळावर एकाचवेळी दोन धावपट्ट्यांवर विमाने उतरतील आणि उड्डाणनही करू शकतील.