
पुणे : युवकांच्या सशक्ततेचा वापर, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार,आणि शाश्वत मूल्यांचे पुनरुज्जीवन हे स्वामी विवेकानंदांचे विचार भारताला ‘विश्वगुरू’ बनवू शकतात असे प्रतिपादन निवृत्त सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले.
भारतीय संस्कृती संगम,पुणे आणि आयडियल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पुष्पात अविनाश धर्माधिकारी यांनी ‘स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील भारत’ या विषयावर आपले विचार मांडले. १२ जानेवारी माँ जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी केली जाते.” जिजाऊंनी महाराष्ट्राला भारतासाठी लढायला शिकवले,तर स्वामी विवेकानंदाने आपल्या विचारांद्वारे भारतीय समाजाला आणि जगाला एक नवा दृष्टिकोन दिला,” असे ते म्हणाले.
स्वामी विवेकानंद यांच्या शिकवणींनी प्रेरित होऊन धर्माधिकारी यांनी सांगितले की, भारताची खरी ताकद तिच्या युवा पिढीत आहे, जिने ऊर्जा,आदर्श आणि नैतिकतेच्या आधारे सामाजिक बदल आणि राष्ट्रीय प्रगती घडवू शकते. त्यांनी सांगितले की स्वामी विवेकानंद यांनी प्रत्येक समस्येचा सामना करतांना विज्ञानात्मक दृष्टीकोन आणि आध्यात्मिक दृष्टिकोन एकत्रितपणे वापरले. त्यांचे विचार आजही अत्यंत प्रासंगिक असून, स्वामीजींच्या शिकवणीतील प्रत्येक क्षेत्रावर केलेले निरीक्षण अनमोल आहे.
अविनाश धर्माधिकारी यांचे मत आहे की,आजकाल आपल्या स्वयं-घोषित ‘पुरोगामी’ धोरणनिर्मात्यांना पाश्चात्य विचारवंतांचे संदर्भ देण्याची आवड असली तरी,ते आपल्या देशातील महान विचारवंतांकडून शिकण्यास कधीही तयार नसतात. स्वामी विवेकानंद यांच्या शिकवणीतील विद्रोह हा बौद्धिक आणि उत्पादक होता,विध्वंसक नव्हता,असे ते स्पष्टपणे म्हणाले. त्याचबरोबर,स्वामीजींच्या ‘विविधतेत एकता’ या संकल्पनेला ते खूप महत्त्व देतात, ज्यामध्ये ‘अनेकतेत एकत्व’ पाहण्याची क्षमता निर्माण केली जाते.
स्वामी विवेकानंद संन्यासी असतानाही त्यांनी तरुणांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक सामर्थ्य वाढवण्याचे महत्त्व सांगितले. त्यांचे मत होते की, केवळ शास्त्रांचा अभ्यास करण्यापेक्षा, प्रत्येकाने आपली आवड आणि निवड ओळखून, सहकार्य आणि सामूहिक प्रयत्नांद्वारे आपल्या जीवनाचे उद्दिष्ट साध्य करायला हवे. “स्वामीजींचे विचार घेऊन मी माझ्या जीवनात भारतमातेचा कार्यकर्ता बनेन,हे जर स्वप्न पडले आणि ते स्वप्न जगू लागलो तर आपण आपला सर्वांचे आयुष्य धन्य होणार आहे. कुठल्या तरी एका विषयाचा ध्यास घ्या. बिजा सारखे स्वतःला पेरून घ्या,आणि दिवस-रात्र त्याचं चिंतन त्या बिजा ला सिंचन. त्यातून कर्तृत्वाचा महावृक्ष येईलच. मी निवडलेल्या क्षेत्रात उत्तमता आणि उंची गाठून मी ते कर्तृत्त्व भारत मातेच्या चरणी अर्पण करेन, हा विचार ज्याच्या मनी आला त्याचे त्याचं आयुष्य धान्य होईल,”असे अविनाश धर्माधिकारी म्हणाले.
१८९३ मध्ये शिकागोतील ‘वर्ल्ड रिलिजन्स पार्लियामेंट’मध्ये स्वामी विवेकानंद यांच्या ऐतिहासिक भाषणाच्या संदर्भात बोलताना अविनाश धर्माधिकारी म्हणाले, स्वामी विवेकानंद यांनी पाश्चात्य देशांच्या हिंदू संस्कृतीकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात बदल घडवून आणला होता. व्याख्यानाच्या समारोपात अविनाश धर्माधिकारी यांनी तरुण पिढीला आवाहन करत सांगितले की, भारताचे भवितव्य तरुणांच्या हाती आहे.त्यांना कार्यशिलता जोपासण्याचे महत्त्व दिले आणि समाजासाठी योगदान देण्याचे प्रेरणादायी शब्द दिले.
जयंत उमराणीकरांचे मनोगत
अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्राचे निवृत्त पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची महती सांगितली आणि त्यांचे कार्य भारतीय समाजासाठी किती महत्वाचे आहे, हे स्पष्ट केले. त्यांनी विशेषतः १८९३ मध्ये शिकागो धर्मसभेतील स्वामी विवेकानंदांच्या भाषणाचे महत्त्व दिले. या भाषणामुळे पाश्चात्य देशांच्या भारताकडे आणि हिंदू संस्कृतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि हिंदू धर्माला एक नवीन ओळख मिळाली. “स्वामी विवेकानंद यांनी भारतीय तत्त्वज्ञानात विरोधाभास नसून, त्याच तत्त्वज्ञानाचे वेगवेगळ्या पद्धतीने दर्शन घडवले,असेही जयंत उमराणीकर यांनी सांगितले. “स्वामी विवेकानंद यांनी अध्यात्माला समाजसेवेच्या कार्याशी जोडले आणि भारत राष्ट्र म्हणून विकसित होण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊले उचलली.”
प्रारंभी, डॉ ऋचा पंडित यांनी “हे वीर विवेकानंद …” हे वैयक्तिक गीत गायले,कार्यक्रमाची सांगता मधुरा वैशंपायन यांनी गायिलेल्या संपूर्ण “वंदे मातरम” ने झाली.