
पवई पोलिसांनी तरुणाला केली अटक
#मुंबई : मूळच्या दिल्लीमधील रहिवासी असलेल्या एका २५ वर्षीय पायलट तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला असून याप्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी घातपाताची शक्यता वर्तवली आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिच्या मित्राला संशयावरुन अटक केली आहे. मित्राने तिचा मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
सृष्टी विशाल तुली (वय २५, रा. अंधेरी, मुंबई) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. आदित्य पंडीत असे आरोपीचे नाव आहे. सृष्टीचे काका विवेककुमार यांनी फिर्याद दिली आहे. सृष्टी ही गोरखपूरमधली पहिली महिला वैमानिक होती. त्यामुळे सर्व कुटुंब आनंदात होते. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनीही तिला सन्मानित केले होते. तिच्या कुटुंबाला लष्करी वारसा आहे. तिचे आजोबा नरेंद्रकुमार तूली १९७१ च्या भारत-पाक युद्धात शहीद झाले होते.
पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०८ अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी (पूर्व) येथील मरोळ पोलीस कॅम्पच्या मागीलबाजूस असलेल्या कानाकिया रेन फॉरेस्टमध्ये सृष्टी तुली भाड्याच्या घरात रहात होती. ती एका खासगी विमान कंपनीत वैमानिक म्हणून काम करीत होती. विशेष म्हणजे आदित्य पंडितनेही वैमानिक होण्यासाठी आवश्यक असलेली परीक्षा नुकतीच दिली होती. या परीक्षेत त्याला अपयश आले होते.
सृष्टी रविवारी गोरखपूरहून परतली होती. त्यानंतर तिचे आरोपीसोबत भांडण झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तो रात्री १ वाजता दिल्लीला निघून गेला. सृष्टीने तीला फोन केला आणि आपण आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे तो, परत तिच्या घरी आला. मात्र, दार आतून बंद करून घेण्यात आलेले होते. आदित्यने किल्लीवाल्याला बोलवून आणले. नवीन किल्ली तयार करून दरवाजा उघडला. त्यावेळी तिने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचे समोर आले. त्याने तिचा मृतदेह खाली उतरवून मरोळमधील सेवन हिल्स रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांनी तिला उपचारांपूर्वीच मृत घोषित केले.
दरम्यान, तिच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती कळवण्यात आली. त्यांनी आदित्यविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली. तो सतत तिच्यासह सर्वांसोबत भांडायचा. त्यामुळे सृष्टी मानसिक तणावाखाली गेली होती. तसेच, तो सातत्याने तिच्या खाजगी आयुष्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत होता. त्याने सृष्टीला विषारी औषध देऊन ठार मारले असावे आणि आत्महत्येचा बनाव रचला असावा असा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. याप्रकरणी तातडीने पावले उचलत पवई पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.