
पुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज व नरवीर तानाजी मालसुरे यांच्या शौर्याची साक्ष देणाऱ्या सिंहगड किल्ल्याच्या विकासासाठी २८५ कोटी रुपयांचा भव्य आराखडा तयार करण्यात आला असून, त्याला राज्य सरकारकडून तत्त्वतः मान्यता मिळाली आहे.
गडाच्या उन्मळून आलेला कल्याण दरवाजा, पुणे दरवाजासह ढासळणारी तटबंदी, बुरुज, पाऊल वाटा, पायर्या, मार्ग, रेलिंग, मंदिरांचे जीर्णोद्धार, संग्रहालय, दिशादर्शक फलक, पाण्याच्या सुविधा, पार्किंग व्यवस्था, प्रकाशयोजना तसेच ५२ जलस्रोतांचे संवर्धन व पुनरुज्जीवन तसेच ऐतिहासिक वास्तूंची शिवकालीन बांधकाम शैलीत उभारणी करण्यात येणार आहे.
या संदर्भात खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी मागील काही वर्षांपासून पाठपुरावा केला होता. त्यांनी या विषयावर विधीमंडळात लक्षवेधी सूचना मांडली, तसेच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही सिंहगडच्या विकासाचा मुद्दा प्रभावीपणे मांडला होता. याशिवाय, राज्याचे सांस्कृतिक मंत्री यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन पत्रव्यवहार करत शासनाचे लक्ष या दिशेने वेधले होते, त्यानुसार प्रशासनाला निर्देश देण्यात आले होते. तापकीर हे गेल्या सात-आठ वर्षांपासून शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करत होते, मात्र आराखडा मंजूर करण्यास शासनाकडून दिरंगाई होत असल्याने अनेक वर्षांपासून विकास आराखडा लालफितीत अडकला होता.
नुकत्याच जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या सादरीकरणात सिंहगड विकास आराखड्याला उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी तत्त्वतः हिरवा कंदील दिला असून, हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी उच्चस्तरीय समितीकडे पाठविण्यात येणार आहे. सिंहगडाच्या जतनासाठी आणि भविष्यातील पिढ्यांना हे ऐतिहासिक वैभव अनुभवता यावे यासाठी माझा सातत्यपूर्ण प्रयत्न अखंड सुरू राहील, असे आमदार तापकीर यांनी सांगितले.
सिंहगड किल्ल्याला शिवकालीन वैभव प्राप्त व्हावे, गडावरील ऐतिहासिक वास्तू, स्थळांचे जतन व्हावे तसेच देशासह जगभरातील शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राष्ट्रीय लढ्याचा जिवंत इतिहास अनुभवता येण्यासाठी विकास आराखडा मंजूर होणे आवश्यक होते. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील निस्सीम भक्तीपोटी विकास आराखडा मंजूर करण्यासाठी बहुमोलाचे योगदान दिले आहे.