
निशब्द… अस्फुट हुंदके… पाणावलेले डोळे… उचंबळून आलेलं हृदय… निरव आणि धीर गंभीर शांतता… भावनावेगाने उर फाटावा… अशी सिनेमागृहातील जवळपास सर्वांचीच स्थिती… अंतर्बाह्य हेलावून सोडणारा सिनेमा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी निर्माण केलाय… हा सिनेमा नाहीच… शिवपुत्र संभाजी महाराजांचा पोवाडा आहे… त्या रुद्रभैरवाचे आख्यान आहे… तरण्याबांड राजाच्या बलिदानाची, औरंग्याच्या क्रौर्याची, महाराणी येसूबाईंच्या त्यागाची, हंबीरराव-रायाजी-अंताजीच्या शौर्याची, छंदोगामात्य कवी कलशाच्या निष्ठापूर्ण मैत्रीची, गणोजी-कान्होजीच्या फितुरीची… ‘ही जाज्वल्य कथा आहे… तांडव करणाऱ्या शंभो महादेवाची’
छत्रपती संभाजी महाराज… हिंदवी स्वराज्याचे द्वितीय अभिषिक्त छत्रपती. छत्रपती संभाजी महाराजांवर एवढ्या मोठ्या क्षमतेचा बहुधा हा पहिलाच सिनेमा असावा. सिनेमा सुरुवातीपासून आपल्याला खिळवून ठेवतो. छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन चरित्र एखाद्या तीन तासांच्या सिनेमापटात दाखविणे केवळ अशक्य. त्यामुळे सिनेमाच्या कथानकाला काही मर्यादा नक्की आल्या आहेत. अत्यंत महत्वाचे आणि मोजके प्रसंग सिनेमात घेण्यात आले आहेत. बुऱ्हाणपूरची लढाई आणि त्याची केलेली राख… काय प्रसंग चित्रित केलाय… वाह. याठिकाणी सिनेमा आपली पकड घेतो, तो शेवटपर्यंत सोडत नाही. अभिनेता विकी कौशल याने आपले सर्व कौशल्य पणाला लावले आहे. मला वाटतंय की त्याने त्याचे १००% देण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्या अभिनयातून साक्षात शंभू राजे प्रत्यक्ष कसे असतील याची जाणीव व्हायला लागते.
अभिनेत्री रश्मीका मंदाना हिने तिच्यापरीने भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. महाराणी येसूबाई म्हणून त्यांनी उत्तम भूमिका निभावलीय. त्या दक्षिणात्य भाषिक असल्याने माही प्रमाणात खटकणारे हिंदी उच्चार सोडल्यास उणे काहीही नाही. महाराणी सोयराबाई म्हणून दिव्या दत्ता, सरलष्कर हंबीरराव मोहिते यांच्या भूमिकेत आशुतोष राणा, रायाजीच्या भूमिकेत संतोष जुवेकर उत्तम शोभलेत. गणोजी शिर्के आणि त्यांचे बंधू कान्होजी शिर्के यांच्या भूमिकेत भडीपा फेम सारंग साठे आणि सुव्रत जोशी यांनी देखील चपखल भूमिका केलीय. येसाजी कंक म्हणून गजनी फेम प्रदीप रामसिंह रावत यांनी देखील उत्तम काम केलंय.
सिनेमाचा पूर्वार्ध संभाजी महाराज छत्रपती होईपर्यंत घडलेल्या घडामोडी यावर आधारलेला आहे. अत्यंत कमी वयात देखील आपल्या बाहुबलावर मुघल सल्तनतीला मराठी मातीची धूळ चारणारे शंभूराजे मनावर अधिराज्य गाजवू लागतात. विकी कौशलची संवादफेक, शारीरिक हावभाव, नजरेतील धार आणि दरारा कमाल… कमाल… कमाल. त्याचा मसान असो की उरी… सॅम बहादूर असो की ‘छावा’… जीव ओतून काम करणे काय असते ते यातून कळते. अत्यंत ताकदीचा हा अभिनेता आहे. त्याला तशा भूमिका मिळायला हव्यात. सिनेमाच्या उत्तरार्धात आपण श्वास रोखून बसतो. हात शिवशिवू लागतात.
सिनेमाला व्हिलन देखील तेवढाच तगडा लागतो… किंबहुना त्यापेक्षा काकणभर अधिक दमाचा अभिनेता असावा लागतो तो. अभिनेता अक्षय खन्ना याने औरंग्याचे पात्र साकारताना आपल्या अभिनयाची क्षमता दाखवून दिली आहे. औरंग्याच्या भूमिकेला क्वचितच कोणी अशा प्रकारे न्याय दिला असता. त्याची नजर, बेरकीपणा, क्रौर्य, सत्तालोलुपता, धर्माभिमान सर्वकाही त्याने चर्येवरील हावभाव आणि नजरेतून व्यक्त केलेत.
शंभूराजे आणि कवी कलश यांची मैत्री विख्यात आहे. कलशांच्या रूपाने त्यांना शेवटपर्यंत साथ देणारा मित्र लाभला. या दोघांच्या काव्याची जुगलबंदी शेवटपर्यंत पहायला मिळते. शिवाजी सावंतांची छावा कादंबरी, वसंत कानेटकर यांचे इथे ओशाळला मृत्यू हे नाटक आणि ज्येष्ठ साहित्यिक विश्वासराव पाटील यांचे संभाजी हे पुस्तक असो अनेक लेखकांनी त्यांच्या मैत्रीचे दाखले दिले आहेत. याच कवी कलशाची भूमिका विनीत कुमार सिंह याने बरहुकूम वठवली आहे.
सिनेमाचे तंत्रज्ञान, ग्राफिक्स, व्हिएफएक्स, लढाईची दृश्य, त्याकाळचे महाल, राहुट्या, वाडे पडद्यावर पाहून आपण देखील त्या काळाचे साक्षीदार होतो. आपण प्रत्यक्ष शिव-शंभू काळ अनुभवू लागतो. सिनेमाचे संगीत चांगले आहे. पार्श्वसंगीत विशेषतः युद्ध दृष्यांमध्ये पाश्चात्य पद्धतीचे वापरले आहे. ए आर रेहमान यांच्या आवाजातील गाणे छान जमले आहे.
संभाजी महाराजांची गुणवैशिष्टये, व्यासंग, काव्य आणि कलांची आवड, शस्त्रनिपुणता, जनहित, प्रजादक्षता, स्वराज्याप्रति निष्ठा आणि समर्पण, श्री शिवरायांबाबत वडील आणि एक राजा म्हणून देखील असलेला आदर… उत्तम पती आणि वडील, आई नसल्याचे दुःख मनात घेऊन वावरणारा हळवा माणूस… किती म्हणून छटा या सिनेमात पहायला मिळाल्या. काही वर्षांपूर्वी आलेल्या मालिकेमधून औरंगजेबाच्या क्रूरतेचे दर्शन घडविण्याबाबत बोटचेपी भूमिका घेण्यात आली. मात्र, लक्ष्मण उतेकर यांनी चित्रित केलेला शेवटचा पाऊणतास मात्र, आपल्या हृदयाची शत शकले करून सोडतो. कोणताही संवेदनशील माणूस रडल्याशिवाय रहात नाही.
संपूर्ण सिनेमागृह स्तब्ध आणि गंभीर होते. अनेकांचे हुंदके कानावर पडू लागतात… अनेकांच्या डोळ्यांना रुमाल लागलेले असतात… तर, शेवट पहावत नसल्याने अनेकजण डोळे मिटून घेतात… आघात… केवळ आघात होतो ती दृश्य पाहून मनावर. क्रूरतेच्या सर्व मर्यादा लांघून आसुरी शक्ती कसा नंगानाच घालतात, थैमान मांडतात… याचं ज्वलंत उदाहरण झळकतं… आणि त्या थैमानाला आपल्या बलिदानाने शंभुराजे मृत्यूचं तांडव घालतात. रक्ताने न्हालेला हा शूरवीर योद्धा… शेवटी साक्षात सोनेरी किरणांच्या प्रकाशात उजळून निघालेल्या सोनेरी कैलासासारखा भासतो.
मित्र-मैत्रिणींनो हा सिनेमा अवश्य पहा… मुलांना दाखवा… सर्वांना किमान छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र वाचायची आणि अभ्यासायची इच्छा होईल. काही त्रुटी जाणवल्या पण त्याकडे दुर्लक्ष करून पाहिले तर सिनेमा खूपच सुंदर झाला आहे.