
इंदापूरातील घटना आली उघडकीस : ग्रामीण पोलिसांकडून दोघांना अटक
#पुणे : नात्यातील एका महिलेकडे वाईट नजरेने पहात असल्याच्या संशयातून एका ज्येष्ठ नागरिकाचा डोक्यात दांडके मारून खून केल्यानंतर त्याचा मृतदेह परस्पर जाळून पुरावा नष्ट करण्यात आला. मात्र, खून लपून रहात नाही असे म्हणतात. त्याचाच प्रत्यय ग्रामीण पोलिसांना आला. हा मृतदेह जाळलेल्या चितेजवळ पडलेल्या एका दांडक्यावर रक्ताचे डाग होते. ही माहिती स्थानिकांनी पोलिसांना कळवली आणि पोलिसांनी एकएक कडी जोडत खूनी शोधले. याप्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली. ही घटना इंदापूरमधील मौजे तावशी गावात ही घटना घडली.
हरिभाऊ धुराजी जगताप (वय ७४ रा. गंगाखेड, जि. परभणी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी दादासाहेब मारुती हरिहर (वय ३० रा. गोखळी, ता. फलटण, जि. सातारा) आणि त्याचा मित्र विशाल सदाशिव खिलारे (वय २३ , रा. गोखळी, ता. फलटण, जि. सातारा ) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वालचंदनगर परिसरात तावशी गावच्या स्मशानभुमीत एक मृतदेह जळत असून, चितेजवळ पडलेल्या लाकडावर मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग असल्याची माहिती १६ नोव्हेंबर रोजी ग्रामस्थांनी पोलीस पाटील यांना दिली. पोलीस पाटलांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करण्यास सुरुवात केली. याठिकाणी जळालेला मृतदेह, पूर्णपणे जळालेली हाडे, तसेच काही अंतरावर रक्त सांडलेले आढळून आले.
याठिकाणी चितेजवळ एक लाडकी दांडके पडलेले होते. तसेच, सरणावर देखील काही हाडेच दिसत होती. दांडक्या वरील रक्ताचे डाग ताजे होते. या प्रकाराबाबत संशय आल्याने पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक देखील समांतर तपास करीत होते. स्थानिक पोलीस आणि एलसीबीच्या पथकांनी इंदापुर, माळशिरस आणि फलटण तालुक्यात याप्रकरणी तपास करण्यास सुरुवात केली. मात्र, काही धागेदोरे हाती लागले नव्हते.
दरम्यान, या चितेसाठी लागणारी लाकडे जेथून आणली त्या वखारीबाबत माहिती मिळाली. ही वखार फलटण येथील गुणवरे गावातील होती. पोलिसांनी तिकडे आपला मोर्चा वळवला. चौकशीमध्ये आरोपी दादासाहेब आणि विशाल यांनीच ही लाकडे अंत्यविधीसाठी नेल्याचे समोर आले. पोलिसांनी तातडीने दोघांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी खुनाची कबुली दिली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, कुलदीप संकपाळ, सहायक फौजदार बाळासाहेब कारंडे, पोलीस कर्मचारी शैलेश स्वामी, गुलाबराव पाटील, गणेश काटकर, अजित थोरात, स्वप्नील अहिवळे, अजय घुले, निलेश शिंदे, विक्रमसिंह जाधव, अभिजीत कळसकर यांनी केली.
आरोपी दादासाहेब याला हरिभाऊ जगताप नात्यातील एका महिलेकडे वाईट नजरेने बघत असल्याचा संशय होता. त्याने मित्र विशालसोबत मिळून खुनाचा कट रचला. हरिभाऊ यांना माण तालुक्यातील सतोबाची यात्रा येथे जाऊ असे सांगत १५ नोव्हेंबर रोजी सोबत घेतले. त्यांना, इंदापुरातील तावशी गावातील स्मशानभुमीजवळ आणले. त्यांच्या डोक्यात दांडक्याने प्रहार करून खून करण्यात आला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह स्मशानभुमीत जाळून टाकण्यात आला.