
xr:d:DAF6HmZ6H0I:1355,j:8233001442763340387,t:24031109
पोलीस हवालदाराला रिक्षात कोंबून मारहाण : सेनापती बापट रस्त्यावरील रत्ना हॉस्पिटल जवळ घडली घटला
पुणे: कामावरून रात्री घरी जाताना रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्या मद्यपी टोळक्याला हटकले म्हणून एका पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करून बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर तक्रार देण्यासाठी पोलीस कर्मचारी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गेला. मात्र राजकीय दबावापोटी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यापर्यंत ही बाब पोहचली. त्यांनी खरडपट्टी काढल्यानंतर तीन दिवसांनी गुन्हा दाखल करुन चतु:श्रृंगी पोलिसांनी चौघांना अटक केली.
याप्रकरणी पोलीस हवालदार चंद्रकांत जाधव (वय ४२, रा. रामोशीवाडी) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रुपेश मांजरेकर (वय २५), अनिकेत राजेश चव्हाण (वय २१), अनिकेत घोडके (वय २४ ), अभि डोंगरे (वय २४, सर्व रा. रामोशीवाडी, वडारवाडी) यांना पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी चंद्रकांत जाधव हे सहकारनगर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार आहेत. गुरुवारी रात्री ते कामावरून घरी निघाले होते. सेनापती बापट रस्त्यावरील रत्ना हॉस्पिटल जवळ त्यांच्या घरापाशी रस्त्याच्या कडेला चौघे आरोपी दारू पिऊन गोंधळ घालत होते. यावेळी जाधव यांनी त्यांना हटकले. तेव्हा आरोपींनी जाधव यांना शिव्या घालण्यास सुरूवात केली. त्यानंतर आरोपींनी जाधव यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. जाधव यांना ओढून एका रिक्षात नेले. त्यांच्या डोक्यात, तोंडावर व छातीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या कपाळावर दगडाने मारले. जाधव यांनी दोनतीनदा वार चुकवले. त्यानंतर ते जखमी अवस्थेत रिक्षातून बाहेर आले.
जाधव यांनी आरोपींचे मोबाइलद्वारे छायाचित्र काढले. आरोपींनी त्यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावला. सर्व जण दुचाकीवरुन पळून गेले. जाधव यांनी त्यांचे मित्र आणि भाऊ घटनास्थळावर आले. जाधव हे चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले. तेव्हा उद्या या प्रकरणाची तक्रार द्या असे सांगून जाधव यांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून येथे पाठवले.
दुसऱ्या दिवशी जाधव पोलीस ठाण्यात गेले असता त्यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यांना बराच वेळ बसवून ठेवण्यात आले. जाधव यांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील दिले. पलिसांच्या ‘तरंग’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकार प्रश्न विचारतील. तुम्ही तक्रार नंतर दाखल करा असे त्यांना सांगण्यात आले. तसेच जाधव यांनी तक्रार दाखल करू नये म्हणून या भागातील एका राजकीय नेत्याने दबाव टाकला.
पोलीस आयुक्तांनी काढली खरडपट्टी
या घटनेबद्दल जाधव यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यापर्यंत ही बाब पोहचली. त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना बोलावून खरडपट्टी काढल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर पोलिसांनी हालचाल करून चौघांना अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने चौघा आरोपींना पोलीस कोठडी सुनावली. एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण झाल्यावर पोलीस कारवाईत कुचराई करत असतील तर सर्वसामान्यांचे काय असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.