
गहाळ झालेला साडे चार कोटींचा मुद्देमाल परत : जानेवारी ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान कारवाई
पुणे : रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांच्या पर्स, बॅग, लॅपटॉप, महत्त्वाची कागदपत्रे, क्रेडिट/डेबिट कार्ड यासारख्या मौल्यवान वस्तू रेल्वे गाड्यांमध्ये आणि स्थानकांवर विसरल्याच्या, गहाळ झाल्याच्या अनेक घटना घडतात. भारतीय रेल्वेच्या कर्मचारी वर्गाने हरवलेल्या वस्तु परत मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने जानेवारी ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान, ऑपरेशन ‘अमानत’ अंतर्गत ४ कोटी ६० लाख रुपयांचे १ हजार ३०६ प्रवाशांचे सामान परत केले आहे.
मुंबई विभागात २ कोटी २८ लाखांचे ५८० प्रवाशांचे साहित्य, भुसावळ विभागात २३० प्रवाशांचे १ कोटी रुपयांचे साहित्य, नागपूर विभागात २९१ प्रवाशांचे ५९ लाख ३८ हजारांचे साहित्य, सोलापूर विभागात ९२ प्रवाशांचे ३६ लाख ७५ हजारांचे साहित्य आणि पुणे विभागात ३५ लाख २२ हजारांचे ११३ प्रवाशांचे साहित्य शोधून परत करण्यात आले.
यातील एका प्रकरणात एक महिला रेनिगुंटा ते मंत्रालयम रोड असा प्रवास करत होती. ट्रेनमधून उतरल्यानंतर साधारण तासाभराने त्यांना आपली पर्स ट्रेनमध्ये विसरल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ रेल्वे हेल्पलाइनवर तक्रार नोंदवली. मध्य रेल्वे – रेल्वे सुरक्षा दलाने त्वरित कार्यवाही करत अधिक माहितीसाठी प्रवाशांशी संपर्क साधला. संबंधित कर्मचाऱ्याला वाडी स्टेशनमध्ये ही गाडी तपासण्याच्या सूचना करण्यात आल्या. तिकीट तपासणीसाच्या मदतीने ट्रेनची तपासणी करण्यात आली. या प्रयत्नातून पर्स परत मिळवण्यात यश आले. तक्रार नोंदवल्यानंतर २० मिनिटांत हा सर्व प्रकार घडला.
तर, दुसऱ्या घटनेत पॉइंट्समन पूजा यांना एटीएम कार्ड, पासबुक, एफडी पावत्या, कागदपत्रे इत्यादींसह १० हजारांची रोकड असलेली बॅग शिव स्थानका नजीक सापडली होती. त्यांनी ती तात्काळ शीव स्थानकाच्या स्टेशन मास्टरकडे सोपवली. चौकशी करून बँक ऑफ महाराष्ट्रच्या पासबुकच्या मदतीने मालकाचा शोध घेण्यात आला. तेव्हा ही बॅग जॉन पीटर या ज्येष्ठ नागरिकाची असल्याचे समोर आले. त्यांच्यांशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेण्यात आले. तसेच, त्यांना ही बॅग परत करण्यात आली.
ऑपरेशन ‘अमानत’ अंतर्गत रेल्वे सुरक्षा दल त्यांच्या नैमित्यिक कर्तव्याच्या पलीकडे जाऊन गरजू प्रवाशांना मदत करत आहे. रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) कर्मचारी नेहमीच रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करत असतात. तसेच, ते लोकांचे प्राण वाचवण्यासाठी, हरवलेल्या वस्तू परत शोधून देण्यासाठी व भटकलेल्या व्यक्तींना योग्य दिशा देत असतात.