मिरवणुकीमध्ये ९६ स्वराज्यरथ सहभागी
पुणे: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंनिमित्त ‘शिवजयंती महोत्सव समिती’च्या वतीने लालमहाल येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यंदा या मिरवणुकीचे १३ वे वर्ष आहे. ‘जय शिवाजी जय भवानी’ च्या जयघोषात सोहळ्याला उत्साहात सुरुवात झाली. सोहळ्यात शिवरायांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. स्वराज्यातील सरदारांच्या घराण्यांच्या वंशजांच्या हस्ते लालमहालातील जिजाऊ माँसाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि जिजाऊ माँसाहेब शहाजी महाराज शिवज्योत प्रज्वलित करून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला.
ढोल-ताशांच्या गजरात आणि सनई-चौघड्यांच्या मंगलमय स्वरात हजारो शिवभक्त पारंपरिक पोशाखात सहभागी झाले होते. फुलांनी आकर्षक सजावट केलेली शिवज्योत, मुख्य स्वराज्यरथ, सरदारांचे आणि मावळ्यांचे प्रेरणादायी ९६ स्वराज्यरथ, तसेच ५१ रणरागिणींच्या ‘महाराणी ताराराणी शौर्य पथका’ने मर्दानी खेळांच्या प्रदर्शन केले. तसेच या वेळी रणरागिणींच्या शौर्य पथकाने शिवकालीन युद्धकला सादर केली. ५१ रणशिंगे, नादब्रह्म ट्रस्ट ढोलताशा पथक आणि सनई-चौघडयांच्या वादनाने वातावरण भारावून गेले.
कार्यक्रमाचे उद्घाटन शिवरायांचे वंशज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले. यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, तसेच शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, आमदार हेमंत उपस्थित होते. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शिवरायांच्या ऐक्याच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. मुरलीधर मोहोळ यांनी स्वराज्य स्थापनेतील सरदार आणि मावळ्यांच्या योगदानाचे स्मरण केले.
शहरात ‘जय शिवाजी-जय भारत’पदयात्रेचे आयोजन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘जय शिवाजी-जय भारत’ पदयात्रेचा शुभारंभ झाला. महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवरायांनी आपल्याला दिलेला स्वाभिमान, एकता, पराक्रम आणि न्यायाचे विचार पुढे नेण्यासाठी एकत्र येणे आणि शिवविचारांचा जागर करणे, हा या पदयात्रेचा मुख्य उद्देश होता. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देत उपस्थितांना संबोधित केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे 12 किल्ले लवकरच जागतिक वारसा केंद्र होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. तसेच एक मजबूत भारत, बलशाली भारत निर्माण करण्यासाठी ‘जय शिवाजी-जय भारत’ ही पदयात्रा आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यावेळी केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, खा. मेधा कुलकर्णी, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री आशिष शेलार, मंत्री दत्तामामा भरणे उपस्थित होते. सीओईपी मैदान ते फर्ग्युसन महाविद्यालयापर्यंत या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेत विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.मावळ्यांच्या घरातील लोक स्वयंस्फूर्तीने या सोहळ्याला हजेरी लावतात. मराठा समाजातील लोक यानिमित्ताने एकत्र येतात. २२ गावातील पासलकर कुटुंबातील लोक या कार्यक्रमात एकत्र आले. त्यासोबतच सर्व समाजातील लोक, अठरापगड जातीतील लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. स्वराज्य रथ उत्सवाचा मार्ग अजून वाढवावा. स्वारगेटपासून या मिरवणुकीला सुरुवात व्हावी. पुढील काळात हा महोत्सव अजून मोठ्या प्रमाणात साजरा केला जावा.
– संजय पासलकर, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ
स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या पासलकर, जेधे, कंक, मालुसरे इत्यादी सरदारांच्या घराण्यातील हजारो वंशज या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले. श्रीमंत कान्होजी जेधे यांच्या घराण्याकडून फुलांच्या जिरेटोपाचा देखावा असलेला रथ यावेळी मिरवणुकीत सहभागी झाला. तसेच श्री शिवाजीराजे मर्दानी आखाड्यातील मुलामुलींनी मर्दानी खेळाचे प्रदर्शन केले. कार्यक्रम नियोजनबद्ध होता. मिरवणुकीत कुठलाही त्रास झाला नाही.
– दिग्विजय जेधे, पुणे
कार्यक्रम छान झाला. मिरवणुकीला उत्तम प्रतिसाद मिळाला. महोत्सवाचे नियोजन चांगले होते. वाहतूक बंद असल्याने सगळे कार्यक्रम सुंदर पद्धतीने करता आले. बांदल घराण्यातील लोकांच्या ढोललेझिम पथकाने छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. कार्यक्रमाचे नियोजन चांगले होते. मागील १३ वर्षापासून या उत्सवाला मिळणारा प्रतिसाद वाढला आहे.
– राजेंद्र पोपटराव बांदल देशमुख, पिसावरे गाव, भोर