
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून भुगाव ग्रामपंचयातीला आणि पाटबंधारेकडून हॉटेल व्यावसायिकांना नोटीसा
पुणे : खडकवासला धारणापाठोपाठ आता जिल्ह्यातील छोटे मोठे तलाव देखील प्रदूषित होऊ लागले आहेत. असाच एक प्रकार समोर आला आहे. भुगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज जलाशय या लघु पाटबंधारे तलावात आसपासच्या हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि विविध आस्थापणांमधून सांडपाणी सोडले जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने भुगाव ग्रामपंचायतीला पत्र पाठवित कारवाई करण्याची सूचना केली आहे. यासोबतच, कोथरूड पाटबंधारे शाखेकडून ग्रामपंचायत आणि काही हॉटेल चालक व जागा मालकांना अतिक्रमण केल्याप्रकरणी नोटीसा बाजावल्या आहेत.
भुगाव तलाव हा खडकवासला पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येतो. या विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाकडून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र पाठवित भुगाव तलावात सोडण्यात येत असलेल्या दूषित पाण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यानंतर कोथरूड पाटबंधारे शाखेकडूनही एमपीसीबीला यासंदर्भात पत्र देण्यात आले होते. कोथरूड पाटबंधारे शाखाधिकारी कार्यालयाने पाठविलेल्या पत्रामध्ये याठिकाणी विविध हॉटेल व्यावसायिकांकडून तलावात सांडपाणी सोडले जात असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर एमपीसीबीने भुगाव ग्रामपंचायतीला याबाबत पत्र पाठवित कारवाईच्या सुचना केल्या होत्या. याबाबतच्या कारवाईचे अधिकार ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदार यांना असल्याचे एमपीसीबीने विशेषता: नमूद केले होते.
दरम्यान, कोथरूड पाटबंधारे विभागानेही काही अतिक्रमण धारकांना नोटीस बाजावल्या होत्या. त्यामध्ये थेट जलाशयातच अतिक्रमण केल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर, अनेकांनी तलावात बेकायदा मोटारी टाकून पाण्याचा उपसा सुरू केला आहे. काही जणांना तलावात दूषित पाणी सोडल्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. ‘हा तलाव खडकवासला पाटबंधारे विभागाच्या मालकीचा आहे. या तलावामधून भुगाव आणि भुकूम या दोन्ही गावांना पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जातो. भुकूम हद्दीतील व्यावसायिक, सदनिकाधारक, सोसायट्या यांचे सांडपाणी मोठ्या प्रमाणावर तलावात सोडले जात आहे. त्यामुळे, पिण्याचे पाणी दूषित होत आहे. या दूषित पाण्यामुळे भुकूम आणि भुगाव येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे अनेक आजार उद्भवण्यास सुरुवात झाली असून रोगराई वाढू लागली आहे. त्यामुळे तलावात सांडपाणी सोडणे तात्काळ बंद करावे. अन्यथा कारवाई केली जाईल’ अशा नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. त्यांना महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ चे उल्लंघन केल्याप्रकरणी अधिनियम ९३, ९४, ९५, ९६ नुसार कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे. या पत्राची प्रत पीएमआरडीएला देखील पाठविण्यात आली होती.
भुगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे उभी राहात आहेत. एकेकाळी निसर्गरम्य परिसर असलेल्या आणि वर्षा सहल, भात शेतीसाठी प्रख्यात असलेल्या भुगावमध्ये आजमितीस टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. वाढत्या नांगरीकरणयासोबतच याठिकाणी मोठ मोठी हॉटेल्स, रेस्टॉरंटस आणि रिसॉर्टस देखील उभी राहिली आहेत. विशेषता: तलाव परिसरात अशा प्रकारची अतिक्रमणे मोठ्या प्रमाणावर उभी राहिली आहेत. त्यावर कारवाई करण्याचे धाडस महापालिका, पीएमआरडीए दाखवीत नाही. राजकीय दबावापोटी प्रशासन बोटचेपी भूमिका घेत असल्याचे चित्र आहे.
भुगाव तलावामध्ये होणारे जलप्रदूषण भविष्यात मोठे समस्या निर्माण करणार आहे. या गावाला होणाऱ्या पाणी पुरवठ्यावरही त्याचा परिणाम होणार आहे. या तलावात सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याचे आणि दूषित पाण्याचे नमुने खडकवासला पाटबंधारे विभागाने घेतले असून हे नमुने तपासणीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठविण्यात आले आहेत. यासंदर्भात पाटबंधारे विभागाने महापालिका आणि पीएमआरडीएकडे कारवाईची मागणी देखील केली होती.
भुगावच्या लघु पाटबंधारे तलावात देखील मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते आहे. याठिकाणी असलेली हॉटेल्स, रेस्टॉरंटस, विविध आस्थापना, काही बांधकामे यांच्याद्वारे दूषित पाणी तलावात सोडले जात असल्याचे आमच्या पाहणीत दिसून आले आहे. त्यामुळे आम्ही दूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तपासणीसाठी पाठविले आहेत.
– श्वेता कुऱ्हाडे, कार्यकारी अभियांता, खडकवासला पाटबंधारे विभागमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला खडकवासला पाटबंधारे विभाग, कोथरूड पाटबंधारे शाखा यांच्या कार्यालयांकडून पत्र प्राप्त झाली होती. भुगाव तलावात होणाऱ्या जलप्रदूषणाबाबत ही पत्र होती. त्याअनुषंगाने आम्ही भुगाव ग्रामपंचायतीला पत्र दिले असून ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदार यांच्या अधिकाराप्रमाणे कारवाई करण्याबाबत पत्र पाठविले आहे. कारवाईचा अधिकार ग्रामपंचायतीचा आहे.
– व्ही. व्ही. किल्लेदार, उपविभागीय अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ