
महिलेने देखील पहिल्या पतीच्या मृत्यूची बतावणी
पुणे : कोंढवा येथे मदरसा चालवणाऱ्या एक मौलाना आधीच्या तीन बायका असताना देखील चौथ्यांदा बोहल्यावर चढला. पहिला पती वारल्याची बतावणी करीत त्याच्याशी लग्न केलेली महिला वर्षभरातच त्याच्याशी भांडू लागली. त्याचे सोने-नाणे-घर तिने बळकावले. मौलानाच्या परस्पर जामखेडच्या एका तरूणाशी तिने तिसरा विवाह केला. तिसऱ्या पतीकडे एक रात्र राहिल्यानंतर ती तेथून देखील पसार झाली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आलिया (ता. वाडा, जि. पालघर) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. तिच्यावर भारतीय न्याय संहिता ३१८(४), ३१९(२), आयटी अॅक्ट ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कोंढव्यात राहणाऱ्या ५९ वर्षीय मौलानाने फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार ३१ ऑगस्ट २०२३ ते १५ डिसेंबर २०२४ दरम्यान कोंढव्यात घडला. मौलाना कोंढवा येथे एक मदरसा चालवितात. मौलानाची देखील तीन लग्न झालेली असून त्याला तीन बायका आहेत. तसेच, चार मुले आणि एक मुलगी आहे. हे सर्वजण एकत्र राहतात. त्यांनी आलीया हीच्यासोबत ३१ ऑगस्ट २०२३ रोजी लग्न केले होते. त्यांचा १९ ऑगस्ट २०२४ रोजी रीतसर खुलानामा झाला होता. एका ओळखीच्या व्यक्तीने त्यांचे लग्न लावले होते. लग्न जुळवणारी ही व्यक्तीच आलिया हिला घेऊन फिर्यादीच्या मदरशा मध्ये आली होती. तिचा पती वारल्याचे सांगत तिला आधार देण्यासाठी लग्न करा अशी आर्जव त्याने केली. ती विधवा असून तिला चार वर्षांची मुलगी आहे, तिला आधाराची गरज असल्याचे सांगितले.
फिर्यादी मौलानाने मदरशामध्येच मुस्लीम धर्मशास्र पध्दतीने निकाह केला. या नव्या पत्नीला त्याने पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात असलेल्या कुडूस गावी नेले. तेथील स्वमालकीच्या फ्लॅटमध्ये तिला ठेवले. पुण्यात रहात असलेल्या मौलानाकडे ती सतत पैसे मागत होती. काही दिवसांनी त्यांना तिच्या वर्तणूकीविषयी शंका आली. शेजाऱ्यांकडून देखील धक्कादायक माहिती समजत होती. तिच्याकडे वारंवार वेगवेगळे पुरुष येतात. ते रात्री मुक्कामी करतात. त्यानंतर काही काळाने तिने मदरशामध्ये येऊन गोंधळ घातला. तसेच, फिर्यादीकडे पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास बदनामी करण्याची धमकी दिली.
कशीबशी समजूत काढून तिला फिर्यादीने पुन्हा गावी नेऊन सोडले. तिच्या मागणीनुसार, तिला दुचाकी गाडी घेऊन दिली. या महिलेने एकदाच पैसे देऊन विषय संपवा. मी खुलनामा तयार करून देते असे सांगितले. त्यांचा शिवाजीनगर न्यायालयात खुलानामा नोटरी करण्यात आला. तिला मेहरमधे १ लाख ३५ हजार रुपये, लग्नावेळी दिलेले सोन्याचे दागीने, १ लाख ४३ लाख रुपये रोख तसेच आधी दिलेली दुचाकी वाडा तालुक्यातील घर देण्यात आले. त्यानंतर, फिर्यादीने तिच्याशी संपर्क तोडला. मात्र, आलीया त्यांना वेळोवेळी फोनद्वारे संपर्क साधत होती. तिने पुन्हा त्यांना धमकावण्यास सुरुवात केली.
फिर्यादीने तिची माहिती काढली असता तिने बहिणीच्या मदतीने एका व्यक्तीला गुन्ह्यात अडकविल्याचे समोर आले. याप्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या व्यक्तीशी संपर्क साधला असता त्याने आलीया पैशांसाठी लोकांना फसवत असल्याचे सांगितले. तिच्या कर्नाटकमधील मूळ गावी जाऊन अधिक माहिती घेतली असता तिचा पहिला पती जिवंत असल्याचे समोर आले. तिने पहिला पती मेल्याचे खोटे सांगत आपल्याशी तिने दूसरा निकाह रचल्याचे फिर्यादीला समजले. तिने १३ जानेवारी २०२४ रोजी पिंपरी-चिंचवडमधे जामखेडच्या व्यक्तीशी तिसरा निकाह केल्याचे देखील समोर आले. त्यानुसार, जामखेडला जाऊन तिच्या तिसऱ्या पतीची भेट घेतली. त्याने ‘ती निकाह झाल्यानंतर एक रात्र राहिली आणि सकाळी पळून गेली.’ असे सांगितले. यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.