
कर्नाटक, बेल्लारी जिल्ह्यातील लक्ष्मी घेण्यासाठी आलेल्या भावंडांच्या डोळ्यात आनंदाश्रू
पुणे : कर्नाटक, बेल्लारी जिल्ह्यातील लक्ष्मीला तीन मुलांच्या प्रसूति नंतर मानसिक आजार जडला होता . या आजारामुळे लक्ष्मी घरातून निघून जात असे. मात्र लक्ष्मीचे पती तिला शोधून घरी आणत. एके दिवशी ती गेली पण परत आलीच नाही. आईच्या मायेचे पारखे झालेल्या मुलांनी आशा सोडली होती. दरम्यान लक्ष्मी खडतर प्रवास करीत ऑक्टोबर २०१६ मध्ये इंदापूराला पोहचली. तिच्या हातात काठी, अक्राळ विक्राळ रूप , दिसले त्यावर काठी उगारत असे. पोलीसानी शिवाजीनगर न्यायालयाच्या आदेशाने येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले. याठिकाणी उपचार घेऊन ती बरी झाली. एक वर्षांपूर्वी कर्जत येथील श्रद्धा फौंडेशन व येरवडा मनोरुग्णालयाच्या अथक प्रयत्नाने लक्ष्मीला घरी पाठवता आले.
लक्ष्मीला घेऊन जाण्यासाठी तिची दोन मुली व एक मुलगा कर्जत येथील श्रद्धा फाउंडेशन संस्थेत आले होते . मुलांना आईला भेटल्याने त्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. आई थकलेली व्हीलचेअरवर आली. तरीसुद्धा मुलांसाठी आई ती आईच असते. आई घरी नसली तरी मुले आईची साडीची पूजा करीत होते. मुलगी परिचारिका झाली असून मुलगा स्वतःची पिक अप वाहन चालवत आहे. वडिलांचे काही वर्षा पूर्वी निधन झाले आहे. आता आई आल्यामुळे भावंडांना मोठा आधार मिळाला आहे.
लक्ष्मीला दोन वर्षांपूर्वी कर्जत येथील श्रद्धा फाउंडेशन संस्थेने पुनर्वसनासाठी पाठविले होते. त्यांनी जबाबदारी घेतली एवढेच नाही तर या संस्थेतील कार्यकर्त्यांनी तिचा शोध घेण्यासाठी कर्नाटकातील बेल्लारी गाठले. त्या ठिकाणी ती ज्या गावात राहत होती तेथील लोकांना लक्ष्मीचे छायाचित्र दाखवून तिच्या कुटुंबांची चौकशी केली तसेच तिच्या छायाचित्र स्थानिक कार्यकर्त्यांना दिले. दरम्यान लक्ष्मीचा मुलाला ही बातमी समजली. मात्र श्रद्धा फाउंडेशन ची रुग्णवाहिका निघून गेली होती. मुलाने चिकाटी न सोडता सीसीटीव्ह कॅमेऱ्याच्या माध्यमातून रुग्णवाहिकेवर लिहिलेल्या मोबाईल नंबर च्या माध्यमातून संस्थेत संपर्क केला. यावेळी आई त्या ठिकाणी असलेले समजताच मुलाने क्षणाचाही विलंब न करता श्रद्धा फाउंडेशन गाठले. तेथे आईला पाहिल्यानंतर भावंडांना आनंदाश्रू वाहू लागले .
“मुलगी दोन वर्षाची असताना लक्ष्मीला मानसिक आजार जडला. प्रसुतीच्या काळात ताणतणाव व घरातील अज्ञानामुळे उपचार घेता आले नाही. त्यामुळे मुले आईच्या मायेचे पारखे झाले. महिलांना वेळीच मानसिक मानसिक आजाराचे निदान झाल्यास उपचार होऊन रुग्ण बरे होऊ शकतात. त्यामुळे कुटुंबाची व समाजाची घडी विस्कटणार नाही.”
– डॉ. क्षमा राठोड
वरिष्ठ मनोविकृतीतज्ञ
येरवडा प्रादेशिक मनोरुग्नालयातील वृद्धा व अपंग कक्षातील मनोरुग्णतज्ञ परिचारिका मंगल बांगर , समाजसेविका अधीक्षक फरीदा शेख, वसप्पा बिराजदार यांनी कन्नड भाषेत लक्ष्मीची संभाषण साधून त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान श्रद्धा फाउंडेशनचे डॉ. भरत वाटवानी व येरवडा प्रादेशिक रुग्णालय यांच्या रुग्णांना घरी पाठवण्याच्या मोहिमेला चांगले यश आले आहे. आत्तापर्यंत 73 रुग्णांचे राज्य अंतर्गत व परराज्यात कुटुंबात पुनर्वसन केले असल्याचे मोहिमेचे समन्वयक भाऊसाहेब माने यांनी सांगितले.
“येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात दीडशे रुग्ण दीर्घकालीन वास्तव्यास आहेत. या रुग्णांना घरी सोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांनी व समाजाने सहकार्य करण्याची गरज आहे . औषधासोबतच रुग्णांना प्रेमाची गरज असते. तरच समाजातील मानसिक आजारावर आपण मात करू शकतो. “
– डॉ. श्रीनिवास कोलोड
– अधीक्षक ,प्रादेशिक मनोरूग्णालय येरवडा, पुणे.