मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत तीन विभागाच्या संदर्भाने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मात्र या कॅबिनेट बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार की नाही यासंदर्भात अनेक अटकळी लावण्यात येत होते. मात्र नाराज असलेले एकनाथ शिंदे अखेर मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते बैठकीत धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या अंजनी दमानिया यांच्या आरोपावर देखील चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकी मध्ये महसूल, जलसंपदा आणि मृदू व जलसंधारण विभागातील महत्त्वाच्या निर्णयाचा समावेश आहे. पुणे, सातारा जिल्ह्यासंदर्भाने हे दोन निर्णय घेण्यात आले असून अभय योजनेला एक वर्ष मुदतवाढ देण्याचा हा निर्णय राज्यभरतील नागरिकांना दिलासा देणारा आहे. राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक होत आहेत. मात्र, अद्याप कुठल्याही बैठकीत काही मोठे निर्णय घेण्यात आल्याचं दिसून आलं नाही. आजच्या बैठकीतही केवळ 3 निर्णय घेण्यात आले आहेत.
पुणे जिल्ह्यातील टेमघर प्रकल्पाच्या (ता. मुळशी) गळती प्रतिबंधक उपाययोजनेची उर्वरित कामे व धरण मजबुतीकरणाच्या कामांसाठी 315 कोटी 5 लाख रूपयांच्या खर्चास विशेष बाब म्हणून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व जावळी तालुक्यातील कोयना जलाशयामध्ये बुडीत बंधारे बांधण्याच्या 25 प्रकल्पांसाठी 170 कोटी रूपयांच्या तरतूदीस विशेष बाब म्हणून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाअंतर्गत विशेष बाब म्हणून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
राज्याच्या महसूल विभागांतर्गत शेती, अकृषिक, निवासी, वाणिज्यिक अथवा औद्योगिक प्रयोजनासाठी तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांना भाडेपट्टयाने किंवा कब्जेहक्काने दिलेल्या शासकीय भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनी भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करताना कमी अधिमूल्य आकारण्याच्या अभय योजनेस एक वर्षांची मुदत वाढ देण्यात आली आहे.
राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे अनेक बातम्या समोर आले आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पद न मिळाल्याने नाराज आहे हे वारंवार समोर येत आहे. तसेच पालकमंत्री पदावरून देखील एकनाथ शिंदे नाराज असल्याने देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर येण्यास अनेकदा टाळाटाळ केली आहे. नगर विकास विभागाचे आढावा बैठकी आयोजित करण्यात आले होते. मात्र या बैठकीत एकनाथ शिंदे गैरहजर राहिल्याने बैठक रद्द करण्यात आली होती. त्यामुळेच एकनाथ शिंदे आजच्या कॅबिनेट बैठकीला हजर राहणार की नाही अशी चर्चा सुरू होती. मात्र अखेर एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेटच्या बैठकीला उपस्थिती लावली.
संतोष देशमुख हत्याकांडानंतर राज्याचे मंत्री धनंजय मुंडे हे आरोपाच्या चक्रव्युवहात अडकलेले आहे. सातत्याने वाल्मीक कराड यांच्याशी असलेल्या संबंधाविषयी आरोप करण्यात येत आहे. त्यातच समाजसेविका अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांच्या कारकिर्दीत कृषिमंत्री असताना कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला असल्याचे पत्रकार परिषद म्हटले. त्यानंतर आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर देखील चर्चा झाली असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.