
नागपूर : राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला आज गुरुवारी (ता. 19 डिसेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उत्तर देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरुवातीला राज्यातील 14 कोटी जनतेचे आभार मानले. नवीन सरकार आल्यानंतर विधानसभेतील हे माझे पहिले भाषण आहे, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विधानसभेच्या सर्व सदस्यांचे आणि 14 कोटी जनतेचे आभार मानतो. 237 आमदार या सत्ता पक्षाच्या बाजूने निवडून आले आणि ही आमची महायुती आहे, असे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आले.
तसेच, मागील पाच वर्ष ही संक्रमणाची वर्ष होती. ज्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप करण्यात आले. ते राजकीय संस्कृतीत कोणीही अनुभवले नव्हते. गेल्या पाच वर्षात व्यक्तिगत मला आणि माझ्या कुटुंबाला टार्गेट करण्यात आले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकाच व्यक्तीवर बोलले, त्यामुळे त्या सर्वांचे आभार मानतो, कारण त्यांनी माझ्याबाबत बोलून जे वातावरण खराब केले, त्यांनी जे मला टार्गेट केले, त्यामुळे माझ्याबाबतीत सहानुभूती निर्माण झाली. कारण पाच वर्षातील माझे काम लोकांनी पाहिले होते. त्यामुळे लोकांच्या मनात माझ्याविषयी विश्वास निर्माण झाला आणि त्यांनी मला निवडून आणून दिले, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
तर, जात जेवढी राजकारण्यांच्या मनात आहे, तेवढी लोकांच्या मनात नाही. समाज एकसंघ झाला आणि त्याचमुळे त्यांनी महायुतीला मतदान केले आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या 30 वर्षात तरी 50 टक्के मतं कोणालाच मिळाली नाही, पण यंदा ती महायुतीला मिळाली. मी तेव्हाही सांगितले होते, की मी आधुनिक अभिमन्यू आहे. मला चक्रव्यूह भेदता येतो. त्यामुळे तो भेदून मी या ठिकाणी उभा आहे, असा इशाराच यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिला. तसेच, याचे श्रेय मी पक्षाला आणि माझ्या सहकाऱ्यांना देतो, असे म्हणत यावेळी त्यांनी शायरी म्हणून दाखवली. यावेळी ते म्हटले की, आंधियो में भी जो जलता हुआ मिल जाएगा, उस दियेसे पुछना मेरा पता मिल जाएगा. असे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आले.
विरोधक नेहमीच म्हणतात की अतिरिक्त 74 लाख मते आली कुठून? ते मी आता सांगतो. कारण निवडणूक आयोगाने विरोधकांना 10 वेळा सांगूनही त्यांच्या कानात जात नाही. तुमच्या कानात नाही गेले तरी चालेल, पण तुमच्या फेक नरेटिव्हला लोकसभेनंतर आम्ही उद्ध्वस्त केले. मात्र, आता तुम्ही पुन्हा फेक नरेटिव्ह फॅक्टरी सुरू केली आहे. ती आता उद्ध्वस्त करण्याकरिता मी उभा आहे, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. यापुढे त्यांनी मतदानाची आकडेवारी सांगत म्हटले की, विधानसभा निवडणुकीत मतदार होते 09 कोटी 70 लाख 25 हजार 191. यापैकी 06 कोटी 40 लाख 88 हजार 195 मतदान झाले. म्हणजे, 66.05 टक्के मतदान झाले. सकाळी 7 ते 9 या वेळेत 6.61 टक्के म्हणजे, 64 लाख 13 हजार 360 मतदान झाले. त्यानंतर सकाळी 9 ते 11 या वेळेत 11.53 टक्के म्हणजेच 01 कोटी 11 लाख 86 हजार 996 मतदान झाले. सकाळी 11 ते दुपारी 01 या वेळेत 14 टक्के मतदान झाले, म्हणजेच, 01 कोटी 36 लाख 22 हजार 327 मतदान झाले. दुपारी 01 ते दुपारी 03 या वेळेत 13.35 टक्के मतदान झाले. म्हणजेच, 01 कोटी 29 लाख 52 हजार 853 आणि दुपारी 03 ते सायंकाळी 05 वाजेपर्यंत 12.69 टक्के म्हणजे 01 कोटी 23 लाख 12 हजार 488 मतदान झाले, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
तसेच, सायंकाळी 6 या वेळेच्याआधी जितके लोक आत येतात, त्या सर्वांना आत घेऊन मतदान करू दिले जाते, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रात्री 08 वाजेपर्यंत मतदान सुरू राहते. त्यामुळे जर पाहिले तर यंदाच्या वेळी या वेळीत 75 लाख 97 हजार 67 लोकांनी मतदान केले आहे. महाराष्ट्रात 01 लाख बूथ आहेत. या बूथवर सरासरी 75 लोकांनी मतदान केले आहे. त्यामुळे एकूण वाढीचा मुद्दा लक्षात घेऊन बोलायचे झाल्यास निवडणूक आयोग 05 वाजेपर्यंतची आकडेवारी जाहीर करतं. पण त्यानंतरची आकडेवारी निवडणूक आयोगाकडून दुसऱ्या दिवशी जाहीर करण्यात येते. हे आज होत नाहीये, तर आजपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत झाले आहे. त्यामुळे 05 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान होते, त्यानंतर अंतिम आकडेवारी आली ती 66 टक्के म्हणजे 7.83 टक्क्यांनी सायंकाळी 5 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत मतदान झाले.
तसेच, पाहिले तर सरासरी प्रत्येक तासाला 5.83 टक्के मतदान झाले आहे. म्हणजेच, सरासरी तासाला 60 लाख मतदान आहे. प्रति मिनीट मतदान हे 98 हजार आहे. याचाच अर्थ एकूण मतदानाचा विचार केला तर 06 वाजेनंतर सरासरी केवळ 17 लाख मतदान आहे, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आली. त्यामुळे 05 ते 06 या वेळेतील मतदान गृहीत न धरता रोज 75 लाख मत कुठून आले, हा प्रश्न विचारला तर, त्याचे उत्तर मिळणार नाही. कारण ही मत कुठूनच आली नाही तर जनतेने मतदान केंद्रावर जाऊन महायुतीला मतदान केले आणि आम्हाला निवडून आणले. त्यामुळे अशा प्रकारचा फेक नरेटिव्ह पसरवू नका, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.