
श्वेता कामतेकर-मोरे
मानवी क्षमतांचा आविष्कार, प्रगत स्थापत्य, वीरश्री आणि पौरुषाचा इतिहास, प्रतिभाशाली आणि विकसीत नगररचना, काव्य-कला-क्रीडा-अध्यात्म यांचा संगम अशा अनेक विशेषणांनी गौरविता येईल अशी विजयनगर साम्राज्याची राजधानी राहिलेले वैभवशाली शहर म्हणजे ‘‘हम्पी’’
हंपी हे भारताच्या कर्नाटक राज्यातील बेल्लारी जिल्ह्यातले एक गाव आहे. हे गाव तुंगभद्रा नदीकाठी वसले आहे. हे गाव प्राचीन हिंदू विजयनगर साम्राज्याचे राजधानीचे नगर होते. हम्पी येथील श्री विरुपाक्ष मंदिर हे प्रसिद्ध आहे. युनेस्कोद्वारे या गावाला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. हम्पी हे गाव पंपा क्षेत्र, किष्किंधा क्षेत्र, किंवा भास्कर क्षेत्र या नावाने पण ओळखले जाते. पंपा हे तुंगभद्रा नदीचे एक जुने नाव आहे. त्यावरूनच याला हम्पी असे नाव पडले असावे असा मतप्रवाह आहे. या नगरीला विजयनगर किंवा विरुपाक्षपुरा असेही म्हटले जाते.
दिवाळीच्या सुटीमध्ये कुठेतरी फिरायला जावे असा बेत होता. त्यानुसार, सहलीचे नियोजन केले. नियोजन करेपर्यंत हम्पीबद्दल फारच जुजबी माहिती होती. परंतू, इंटरनेट आणि पुस्तकांमधून जी काही माहिती उपलब्ध करुन घेता येईल ती घेतली. ती अर्थातच पुरेशी नव्हती हे प्रत्यक्ष हम्पीमध्ये गेल्यावर समजले.
तर… हम्पीमध्ये काय आहे… मी म्हणेन काय नाही… सृष्टी सौंदर्य, भव्य प्रासादांचे अवशेष… भव्य मंदिरे… त्यावरील अफलातून आणि अविश्वसनीय अशी कारागिरी… स्थापत्यशास्त्राचा एक आविष्कार याठिकाणी पहायला मिळतो. विरुपाक्ष मंदिर, 12 आणि 18 फुटी गणेशाच्या मुर्ती, नरसिंह मुर्ती, श्री विठ्ठल मंदिर, राजा कृष्णदेवरायाच्या राजवाड्याचे अवशेष, राणी महाल, कमल महल (लोटस टेम्पल), हत्तीखाना, हजारी राम मंदिर, बाजारपेठा, श्रीकृष्ण मंदिर, कोदंड राम मंदिर, पाताळेश्वर मंदिर, अशा एक ना शेकडो वास्तूंसह दुथडी भरुन वाहणारी सुंदरशी तुंगभद्रा नदी…. सोबतीला ॠषीमुख पर्वत (रावणाने सीतेला पळविताना तिने दागिन्यांची पुरचुंडी बांधून खाली टाकली. ती याच पर्वतावर पडल्याची आख्यायिका आहे.)
येथील प्रत्येक वास्तू आणि ठिकाणाला इतिहास आहे… तसेच संदर्भही आहेत. मुर्त्यांच्या आणि मंदिरांच्या निर्माणामागे ऐतिहासिक कथा आहेत. हम्पी पाहताना थक्क व्हायला होतं. अक्षरश: अलिकडेच आलेल्या ‘बाहुबली’ सिनेमातील भव्य महालांची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. एक-दोन-तीन-चार-पाच कितीही दिवस हम्पी पहायला कमीच पडतात. त्यातही अगदी घाईत पहायचे झाले तरी तीन दिवस एकट्या हम्पीला द्यावे लागतात.
हम्पीला लागूनच असलेला अंजनेय पर्वत हा विशेष आकर्षण असतो. हनुमानाचा जन्म झालेले हे ठिकाण पाहणे रोमांचकारी आहे. हा संपुर्ण परिसर म्हणजे रामायण काळातील किश्किंदा नगरीचा परिसर आहे. माहितगार (गाईड) तुम्हाला माहिती देत असतात. तसे तुमच्या डोळ्यासमोर प्रसंग उभे राहून त्याच्याशी तुम्ही अधिक ‘रिलेट’ व्हायला लागता. येथील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या मार्गाने श्रीराम आणि लक्ष्मण दक्षिणेत गेले त्या मार्गावर जागोजाग ‘श्रीराम वन गमन मार्ग’ असे फलक पहायला मिळतात. अंजनेय पर्वताजवळ असलेले रामायणात उल्लेख येणारे ‘पंपा सरोवर’ पहायलाच हवे. अर्थात हम्पी पहायचे असल्यास ‘पेशन्स आणि एनर्जी’ फार आवश्यक आहे.
‘‘हम्पीला जाताना सोलापूर-विजापूर-होसपेट-हम्पी मार्गाने जावे. जाताना शक्यतो हम्पीमध्ये राहण्याचेच नियोजन करावे. तेथे गाईड उपलब्ध होतात. बार्गेनिंग अवश्य करावे. हम्पीमध्ये राहण्याचा एक फायदा असा की सकाळी उठून लगेच तुम्ही स्थळांना भेटी देऊ शकता. होसपेटवरुन 40 मिनिटांचा प्रवास करुन येणे जरा आळसवाणे ठरते. हम्पीमध्ये भारतीय जेवण मात्र काही ठराविकच ठिकाणी मिळते. कॉन्टीनेंटल, चायनीज आणि विदेशी अन्नपदार्थ अधिक मिळतात. कदाचित विदेशातून अभ्यासासाठी तसेच जिज्ञासेपोटी येणाºयांची संख्या अधिक असल्याने अशा हॉटेल्सची संख्या अधिक असावी. सहलीसाठी स्वत:चे वाहन नेलेत तर अधिक उत्तम… त्यामुळे छोटी छोटी ठिकाणेही पाहून होतात. गाईड अवश्य घ्यावा. ’’
हम्पीला जोडूनच पाहण्यासारखे म्हणजे आवर्जून पहावे असे आणखी एक ठिकाण म्हणजे ‘बादामी’’
बादामीला पूर्वी वाटापी म्हणून ओळखले जात असे. कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात याच नावाने तालुक्याचे मुख्यालय आहे. हे त्याच्या रॉक कट स्ट्रक्चरल मंदिरांमुळे प्रसिद्ध आहे. विस्तीर्ण अशा तळ्याच्या भोवताली बादामीतील प्रमुख प्रेक्षणिय स्थळे आहेत.
लाल रंगाच्या खडकामध्ये कोरलेल्या चार लेण्या अप्रतिम आहेत. यातील तीन लेण्या अस्सल हिंदू धाटणीच्या लेण्या आहेत. तर एक लेणी जैन लेणी असून या लेणीमध्ये भगवान महावीरांसह तिर्थंकरांच्या दिगंबर मुर्त्या कोरलेल्या आहेत.
यासोबतच अन्य तीन हिंदू लेण्यांमध्ये हिंदू देवदेवता, दशावतारांसह नटराज वगैरे मुर्त्या कोरलेल्या आहेत. अत्यंत सुबक व देखणी कलाकुसर याठिकाणी पहायला मिळते. डोळ्यांचे अक्षरश: पारणे फिटते. बादामीला रामायण आणि महाभारतातील अनेक संदर्भ आहेत. त्याकाळातील ठिकाणांची नावे आजही प्रचलीत आहेत. बादामीची हेरिटेज सिटी म्हणून निवड करण्यात आलेली आहे. बादामीमध्ये आठ शिलालेख असून हे शहर चालुक्यांनी वसविल्याचे सांगितले जाते. यासोबतच बनशंकरी अर्थात शाकंभरी देवीचे भव्य मंदिरही आकर्षण आहेच.
‘‘बादामीमध्ये राहण्याची चांगली सोय नाही. तेथील लॉजेसचा दर्जा अतिशय खालच्या पातळीचा आहे. त्यामुळे तेथे राहण्याचा पर्याय शक्यतो टाळावा. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो.’’
या सहलीच्या शृंखलेतील तिसरे आवर्जून पाहण्यासारखे ठिकाण म्हणजे पट्टदकल्लु – (स्वैरपणे) राजबैठकीचा दगड)
हे भारतातील कर्नाटक राज्याच्या बागलकोट जिल्ह्यात असलेले एक खेडे आहे. या ठिकाणास युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे. हे खेडे बदामीपासून २२ किलोमीटर व ऐहोळेपासून १० किलोमीटर अंतरावर आहे. ऐतिहासिक मंदिरांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. दरवर्षी जानेवारी- फेब्रुवारीत चालुक्य महोत्सव नावाचा वार्षिक नृत्य महोत्सव होतो. या महोत्सवाला खूप पर्यटक येतात. युनेस्कोने इ. स. १९८७ साली या ठिकाणी असलेल्या मंदिरांचा आपल्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केला. इ. स. च्या ८ आठव्या शतकात बांधली गेलेली ही मंदिरे भारतीय द्राविड आणि नागर या दोन्हीही स्थापत्यशैलीत आहेत.
पट्टदकल ही चालुक्य राजघराण्याची राजधानी होती. कन्नड साहित्यातील सिंगिराज पुराणातील उल्लेखानुसार तत्कालीन पुराणकालीन निग्रा, नहुष, नल, पुरुष, वसु, सागर, नंद आणि मौर्यकालीन राजे इत्यादींनी त्यांचा ‘पट्टबंध’ महोत्सव म्हणजे राज्याभिषेक करण्यासाठी या ठिकाणाची निवड केली होती. मानवी उत्क्रांतीचा प्रारंभ येथे खूप पूर्वी झाला असावा असे मानले जाते. येथील पापनाथ मंदिरापासून सुमारे २०० मीटर अंतरावरील मलप्रभा नदीच्या पात्राजवळ शेकडो दगडी हत्यारे सापडली आहेत. त्यांचा वापर येथील मंदिराच्या शिल्पकलेसाठी झाला असावा असा एक अंदाज व्यक्त केला गेला आहे. ‘अ गाइड टू जॉग्रफी’ या दुसºया शतकाच्या मध्यावरील काळाच्या संशोधन पुस्तकात या शहराचा रोमन साम्राज्याशी व्यापार होता असा उल्लेख आहे. म्हणजे त्या काळात हे व्यापारीदृष्टय़ा प्रगत शहर असे पुरावे मिळतात.
‘बादामी आणि पट्टदकल ही दोन्ही ठिकाणे एकाच दिवसात पाहून होऊ शकतात. अगदीच वेळ देऊन पहायचे असल्यास दोन्ही ठिकाणांना एक-एक दिवस स्वतंत्रपणे देणे केव्हाही उत्तमच.’’