
भारतीय संघ गुरुवारी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. भारतीय संघासमोर पहिल्या सामन्यात बांगलादेशचे आव्हान असेल . मात्र, भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
खरंतर, अलीकडेच बीसीसीआयने आपल्या आदेशात म्हटले होते की, खेळाडू कोणत्याही दौऱ्यावर त्यांच्या कुटुंबियांसोबत राहू शकणार नाहीत, परंतु आता यामध्ये बदल होण्याची चर्चा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, खेळाडूंचे कुटुंब चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फक्त एकच सामना पाहू शकतील.
अन् बीसीसीआयने घेतला होता कठोर निर्णय..
बीसीसीआयने खेळाडूंच्या कुटुंबियांना चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एक सामना पाहण्याची परवानगी दिली आहे, परंतु यासाठी बीसीसीआयकडून परवानगी घ्यावी लागेल. यानंतर, खेळाडूंचे कुटुंब चॅम्पियन्स ट्रॉफीमधील एक सामना पाहू शकतील.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया दुबईत आहे. आधीच्या नियमानुसार, या दौऱ्यावर कोणताही भारतीय खेळाडू आपल्या कुटुंबाला घेऊन जाऊ शकत नाही किंवा ठेवू शकत नाही, असे वृत्त समोर आले होते. मात्र, आता बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने एका मीडिया रिपोर्टमध्ये असे लिहिले आहे की जर एखाद्या भारतीय खेळाडूला त्याच्या कुटुंबाला दुबईला घेऊन जायचे असेल तर तो फक्त एका सामन्यासाठी असे करू शकतो.
खरंतर, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाच्या खराब कामगिरीनंतर, बीसीसीआयने एक कठोर निर्णय घेतला होता, परंतु आता त्यात बदल होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या नवीन नियमांनुसार, जर ४५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीचा दौरा असेल तर भारतीय खेळाडू त्यांच्या कुटुंबियांसोबत काही वेळ घालवू शकतात… परंतु जर त्यापेक्षा कमी दिवसांचा दौरा असेल तर क्रिकेटपटू त्यांच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवू शकणार नाहीत.
दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा १९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. तर २० फेब्रुवारी रोजी भारतीय संघ बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. यानंतर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध खेळेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २३ फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. यानंतर भारत आणि न्यूझीलंडचे संघ २ मार्च रोजी एकमेकांसमोर येतील. भारतीय संघ त्यांचे सामने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळेल.