
वाहतूक पोलिसांचा होता प्रस्ताव : शहराच्या वाढत्या पसा-यात वाहतूक नियोजन ढेपाळले
पुणे : एकेकाळी पेठांपुरत्या मर्यादीत असलेल्या पुणे शहराचा परिघ आता ५० किलोमिटरच्या घरात गेला आहे. शहराची लोकसंख्या वाढत्या उद्योगधंद्यांमुळे झपाट्याने वाढत चालली आहे. उपनगरे वाढण्यासोबतच समाविष्ट गावांमधील हद्दी शहरात आल्या आहेत. त्यामुळे रस्त्यांवरचा ताण कमालीचा वाढला आहे. उपलब्ध रस्ते कमी पडत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पार फज्जा उडालेला आहे. वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी यंत्रणांमध्ये संवादाचा असलेला अभाव वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहे. वाहतुक व्यवस्थेसंदर्भातील नेमके नियोजन करण्याकरिता पुणे शहर वाहतूक पोलिसांनी १४ वर्षांपूर्वी राज्य शासनाकडे ‘ट्रॅफिक इंजिनिअर’ सह १७ पदांची मागणी केली होती. मात्र, ही मागणी अद्यापही प्रलंबित आहे. वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने महत्वाच्या प्रस्तावांकडे दुर्लक्ष होत राहिल्यास कोंडीवर उपाय निघणार कसा असा प्रश्न आहे.
एखाद्या रस्त्याची तसेच रस्त्यावरच्या वाहतूक विषयक गोष्टींची निर्मिती करताना या विषयातील तज्ज्ञाची आवश्यकता असते. सिग्नल कोणत्या ठिकाणी हवा, तो किती वेळासाठी हवा, इथपासून पदपथ आणि रस्त्याची उंची, लांबी, रुंदी यांचाही शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करुन त्याची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असते. वाहतूक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वाहतूक कायदेविषयक पुस्तकांचे वाचन करुन तसेच ठिकाणांना भेटी देऊन त्यांचा अभिप्राय देत असतात. परंतु, त्यामध्ये ‘एक्सपर्ट ओपिनियन’ नसते. वाहतूक पोलिसांनी केलेली पाहणी अथवा सुचविलेले अभिप्राय निर्दोष आणि अचुक असतीलच असे नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी शासनाकडे वाहतूक विषयातील अभियंत्यांची मागणी केली होती.
एक कार्यकारी अभियंता, सिव्हील आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागासाठी प्रत्येकी एक उप अभियंता, दोन सहायक अभियंते, कनिष्ठ अभियंते आणि आरेखक अशी एकूण बारा पदे शहर वाहतूक पोलिसांसाठी देण्यासंदर्भातील प्रस्ताव ५ ऑक्टोबर २००९ रोजी राज्य शासनाकडे सादर करण्यात आला होता. परंतु, त्याचा वारंवार पाठपुरावा करुनही शहर पोलिसांच्या हाती मात्र निराशाच पडली आहे. शहराची सध्याची लोकसंख्या ५५ लाखांच्या पुढे गेली आहे. शहराच्या रस्त्यांचा श्वास अतिक्रमणे, चुकीचे बांधकाम, बेकायदा वाहतूक, बेकायदा पार्किंग यामुळे कोंडत चालला आहे. अपघात प्रवण क्षेत्र, चौक, रस्ते, उड्डाण पुल, भुयारी मार्ग, पादचारी भुयारी मार्ग, रस्त्यावरुन धावणा-या वाहनांची वेगमर्यादा निश्चित करण्यासोबतच, रिंग रोड यांच्या शास्त्रीय निर्मितीसाठी त्या विषयातील तज्ज्ञांमार्फत पाहणी आणि प्रक्रिया राबवली जाणे आवश्यक आहे.
शहरामध्ये मेट्रोचे काम सुरू आहे. त्यापार्श्वभुमीवर शहरातील रस्त्यांसह रहीवासी आणि व्यापारी भागांचा, अद्योगिक क्षेत्राचा विचार करुन भविष्यातील वाहतूक, वाहनांची वाढणारी संख्या याचा विचार करुन धोरण निश्चित करण्याची आवश्यकता आहे. रस्ते आणि त्याला जोडून येणा-या घटकांच्या निर्मितीसाठी मुख्यत्वे बांधकाम आणि इलेक्ट्रिकल विषयातील तज्ज्ञांची आवश्यकता आहे. वाहतूक पोलिसांनाही रस्त्यांच्या निर्मितीपासून ते सिग्नल व्यवस्था, नियंत्रण कक्ष अद्ययावत ठेवण्यासाठी अभियंत्यांची आवश्यकता आहे. मुंबई वाहतूक पोलिसांसाठी वाहतूक अभियंत्यांची १७ पदे आहेत. त्यांना मनुष्यबळही देण्यात आलेले आहे. यासोबतच महामार्ग पोलिसांनाही वाहतूक अभियंता देण्यात आलेला आहे. मग, आयटी सिटी असलेल्या पुण्याची लोकसंख्या आणि वाहनसंख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली असतानाही शहराची वाहतूक सुधारण्यासाठी वाहतूक अभियंता देण्यामध्ये उदासिनता का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीवरचा ताण मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मेट्रोचा मार्ग तयार करताना येणा-या अडचणींचा सामना करणे अवघड होत आहे. उड्डाण पुलांची कामे, बेकायदा वाहतूक, अतिक्रमणे आणि पीएमपी बसेसच्या गर्दीने शहरातील चौकांची दैना केलेली आहे. अपुरे आणि त्रुटी असणारे उड्डाणपुल शहरामध्ये बांधले गेल्यामुळे वाहतूकीची समस्या सुटण्याऐवजी अधिकच गंभीर झाल्याचे पहायला मिळते आहे. वाहतुकीच्या पुरेशा अभ्यासाशिवाय उभारण्यात आलेले हिंजवडी, मगरपट्टा, हडपसर, पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलांची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे. मेट्रोच्या कामासाठी पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडण्यात आला आहे. रस्त्यांच्या विकास कामांसाठी प्रभावी यंत्रणा नाही. बराच काळ कामे रेंगाळत आणि प्रलंबित पडलेली दिसतात.
वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी प्रभावी अतिक्रमण निर्मुलन राबवण्याची आवश्यकता आहे. यासोबतच कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करणेही गरजेचे आहे. एस. टी., रेल्वे स्थानकांचे विकेंद्रीकरण करणे, स्वयंशिस्तीसाठी जगजागृती करणे आणि वाहतूकी योग्य व सुसज्ज असे रस्त्यांची निर्मिती केल्यास वाहतूक व्यवस्था सुधारु शकेल.
वाहतूक पोलिसांनी दिलेला प्रस्ताव
पदनाम । पदसंख्या
कार्यकारी अभियंता । ०१
उपअभियंता । ०२
सहायक अभियंता । ०३
कनिष्ठ अभियंता । ०४
आरेखक । ०२
वाहन चालक । ०३
कनिष्ठ लिपीक । ०२
पुणे शहराची वाहतूक विषयक माहिती
भौगोलिक क्षेत्र – ५३० चौरस किमी
लोकसंख्या – ५५ लाखांपेक्षा अधिक
वाहनसंख्या – ४० लाख
रस्त्यांची लांबी – ३ हजार ३५० किलोमिटर
चौकांची संख्या – १ हजार ५००
सिग्नलाईज जंक्शन – ४०० पेक्षा अधिक
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था – २००० पेक्षा अधिक (पीएमपी बसेस)
वाहतूक नियमभंग केसेस – ३ लाखांपेक्षा अधिक
प्राणांतिक अपघात – ३०० च्या आसपास सरासरी