
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा दावा, रेवंथ रेड्डींकडे होती भोकर विधानसभेची जबाबदारी
#नांदेड : भोकर मतदारसंघात भाजप उमेदवार श्रीजया चव्हाण यांच्या पराभवासाठी काँग्रेस पाण्यासारखा पैसा खर्च केला. या मतदारसंघाची जबाबदारी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींवर सोपवण्यात आली होती. मात्र तरीही श्रीजया विजयी झाली कारण मी काँग्रेस रणनीती अचूकपणे ओळखली असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे. महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. दरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया याही भोकर या मतदारसंघातून आमदार झाल्या आहेत. ही निवडणूक सोपी नव्हती, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. विजयानंतरच्या एका सभेत चव्हाण बोलत होते. चव्हाण म्हणाले, मी जेव्हा निवडणूक लढली होती तेव्हा समीकरणे वेगळी होती. आताची परिस्थिती वेगळी आहे. तेव्हा लोकांचा भर कामांवर होता. मी मतदारसंघात प्रचंड काम केले आहे. पण फक्त काम चालते असे नाही. सोशल मीडियावर होणार प्रचार, तिथे आपल्याबद्दल चालणारा अपप्रचार या सगळ्या गोष्टी तरुण वर्ग लक्षात घेतो. तरुण वर्गाच्या आता वेगळ्या अपेक्षा असतात.
श्रीजया जेव्हा निवडणुकीच्या रिंगणात होती तेव्हा मी हे देखील पाहिले की ज्या मंडळींना मीच मोठे केले, तेच या निवडणुकीत माझ्या विरोधात उभे होते. मला विरोधक नवखा नव्हता. मी पहिली निवडणूक लढलो त्यावेळी विरोधक विरोधी पक्षातले होते. या निवडणुकीत आपणच मोठे केलेले विरोधक होते. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्याकडे फक्त भोकर मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांचे दोन मंत्री मतदारसंघात तळ ठोकून होते. प्रचंड पैसा वापरला गेला. मला घेरण्याची पूर्ण तयारी काँग्रेसने केली होती. त्यामुळे श्रीजयासाठीच्या ज्या निवडणुकीला आम्ही सामोरे गेलो ती सोपी नक्कीच नव्हती. मला कल्पना होती की काँग्रेसकडून कसा अटॅक होऊ शकतो. कारण मी इतकी वर्षे काँग्रेसमध्ये काढली आहेत. मात्र तेलंगणाचा पूर्ण फोकस माझ्यावर होता. श्रीजया चव्हाण निवडून येऊ नये म्हणून अनेक प्रयत्न झाले.