
मागील वर्षीपेक्षा १० टक्के पाणीसाठा अधिक; मॉन्सूनच्या आगमनापर्यंत काटकसरीने वापराची गरज
#मुंबई
राज्यात तापमानाचा पारा चढला आहे. बहुतांश ठिकाणी ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद होत आहे. त्यामुळे आतापासूनच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. होळीदिवशी राज्यातील धरणांमध्ये सरासरी ५३.४१ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले. मागील वर्षीच्या तुलनेत साधारणत: १० टक्के पाणीसाठा अधिक आहे.
गेल्यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, अवकाळी पावसाचा फटका, प्रचंड तापमान आणि हवामानातल्या टोकाच्या बदलांनी अनेक धरण साठे शून्यावर गेले होते. मात्र, मागच्या पावसाळ््यात जोरदार पाऊस झाला आणि धरणे तुडुंब भरली. परंतु यंदा फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच उन्हाच्या झळा जाणवल्याने धरणांतील पाण्याची पातळी लवकर खालावण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आता बऱ्याच धरणातील पाणीसाठी कमी झाल्याचे चित्र आहे. राज्यात धरणांतील पाणी पातळी खालावल्याने आता पाणीसाठा सरासरी ५३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. राज्यात लघु मध्यम आणि मोठ्या अशा एकूण २९९७ धरणांमध्ये होळीच्या दिवशी ५३.४१ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. नागपूर व अमरावती विभागात ४९.३० टक्के आणि ५७.८८ टक्के पाणीसाठा आहे. मराठवाड्यातील ९२० धरणांमध्ये ५२ टक्के पाणी शिल्लक असून मागील वर्षी याच सुमारास मराठवाड्यात केवळ २३.५३ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. नाशिकच्या ५३७ धरणांमध्ये ५३.६८ टक्के पाणी शिल्लक आहे. पुणे विभागातील धरणांमध्ये ५२.९७ टक्के तर कोकण विभागात ५८.१३ टक्के पाणीसाठा आहे.
जायकवाडीसह उजनीत किती पाणी शिल्लक?
मराठवाड्यातील हजारो नागरिकांची तहान भागवणारे जायकवाडी धरण सध्या 63 टक्क्यांवर आहे . गेल्यावर्षी जायकवाडीत याच दिनांक 24.44% पाणी शिल्लक होते. पुण्यातील डिंभे धरण ४५.३६ टक्के, भाटघर ६१.५५ टक्के तर खडकवासला ६९ टक्क्यांवर आहे .मागील वर्षी यात सुमारास शून्यावर असलेले उजनी सध्या ४३.२९ टक्क्यांवर आहे, असे जलसंपदा विभागाने सांगितले .धाराशिवमधील निम्न तेरणा याच काळात मागील वर्षी ५.५३ टक्क्यांनी भरले होते. आता तेरणात ७४.०२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नाशिकच्या गंगापूर धरणात ७२.५३ टक्के तर गिरणा धरणात ४२.९६ टक्के तर भाम धरण ४६.८५ टक्के
भरले आहे.
राज्यात मार्चमध्ये ते मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत उन्हाळ्याचा तडाखा असतो .तापमानाचा पारा सातत्याने चढा राहतो. त्यामुळे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर झाल्याने तसेच विसर्ग केल्याने महिनाभरानंतर पाणीटंचाईचे सावट गडद होण्याची शक्यता असते. सध्या राज्यात ठीक ठिकाणी उष्णतेच्या लाटा फेब्रुवारी महिन्यापासूनच सुरू झाल्या आहेत. भारतीय हवामान विभागाने यंदा सर्वाधिक तापमानाचे राहणार असल्याचा इशाराही दिला आहे. यंदा उन्हाळ्यात तापमान सरासरीपेक्षा अधिक असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर मंगळवारी(दि. ११) राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला (३९.५ अंश) जिल्ह्यात नोंदवले गेले. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने १२, १३ मार्चला विदर्भातील अकोल्यासह काही भागाला उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता