
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठणकावले : पाकसोबतच्या कोणत्याही चर्चेचा केंद्रबिंदू दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीरच असेल
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले. अलीकडच्या काही दिवसात देशाने भारताचे सामर्थ्य आणि प्रतिरोधकता या दोन्ही गोष्टींचा अनुभव घेतला, असे ते आपल्या संबोधनात म्हणाले. त्यांनी प्रत्येक भारतीय नागरिकाच्या वतीने देशाची साहसी सशस्त्र दले, गुप्तचर संस्था आणि शास्त्रज्ञांना अभिवादन केले. ऑपरेशन सिंदूरचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारताच्या शूर जवानांनी दाखवलेल्या अविचल साहसी वृत्तीला त्यांनी अधोरेखित केले. त्यांचे शौर्य, चिकाटी आणि अदम्य भावनेचे त्यांनी कौतुक केले. हे अतुलनीय शौर्य देशातील प्रत्येक माता, बहीण आणि मुलीला समर्पित करत असल्याचे त्यांनी सांगितले.
दहशतवादी संघटनांना कठोर इशारा…
22 एप्रिलला पहलगाममध्ये झालेल्या क्रूर दहशतवादी हल्याचा निषेध करत ते म्हणाले की या हल्ल्याने देश आणि संपूर्ण जग या दोघांना मोठा धक्का बसला. हा हल्ला म्हणजे दहशतवादाचे अतिशय भयावह प्रदर्शन होते ज्यामध्ये आपल्या सुट्यांचा आनंद घेण्यासाठी आलेल्या निष्पाप नागरिकांना त्यांचा धर्म विचारून त्यांची कुटुंबे आणि मुलाबाळांसमोर निर्दयीपणे ठार करण्यात आले, असे मोदी यांनी सांगितले. हे केवळ एक क्रौर्याचे कृत्यच नव्हते तर देशाच्या एकतेला भंग करण्याचा एक निंदनीय प्रयत्न होता, यावर त्यांनी भर दिला. या हल्ल्याबाबत तीव्र दुःख व्यक्त करत, संपूर्ण देशाने, प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक समुदायाने, समाजातील प्रत्येक स्तराने आणि प्रत्येक राजकीय पक्षाने कशा प्रकारे एकजूट होत दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली ते पंतप्रधानांनी अधोरेखित केले. दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य सरकारने सशस्त्र दलांना दिले आहे,असे त्यांनी सांगितले . देशाच्या महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याच्या प्रयत्नांचे परिणाम काय होतात, ते आता दहशतवादी संघटनांना पुरेपूर समजले असेल असे सांगत त्यांनी दहशतवादी संघटनांना कठोर इशारा दिला.
ऑपरेशन सिंदूर ही न्यायासाठी केलेली एक अढळ प्रतिज्ञा..
“ऑपरेशन सिंदूर हे केवळ एक नाव नाही तर लाखो भारतीयांच्या भावनांचे प्रतिबिंब आहे”, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले आणि हे आॅपरेशन म्हणजे न्यायासाठीची एक अटल प्रतिज्ञा आहे, असे वर्णन केले. संपूर्ण जगाने 6-7 मे रोजी ही प्रतिज्ञा पूर्ण होताना पाहिली. पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर आणि प्रशिक्षण केंद्रांवर अचूक हल्ले करून निर्णायक धक्का दिला. त्यांनी असे म्हटले की, दहशतवाद्यांनी कधीच कल्पना केली नव्हती की, भारत इतके धाडसी पाऊल उचलेल, परंतु जेव्हा राष्ट्र प्रथम या मार्गदर्शक तत्वानुसार राष्ट्र एकजुटीने उभे राहते तेव्हा ठाम निर्णय घेतले जातात आणि परिणामकारक निकाल दिले जातात. त्यांनी सांगितले की, पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर भारताने केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमुळे केवळ त्यांच्या पायाभूत सुविधाच नाहीत तर त्यांचे मनोबलही ढासळले.
भारताच्या अचूक आणि जोरदार हल्ल्यांमुळे पाकिस्तान हताश
पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले की बहावलपूर आणि मुरीदके सारखी ठिकाणे दीर्घकाळापासून जागतिक दहशतवादाची केंद्रे म्हणून कार्यरत होती, त्यांचा संबंध जगभरातील मोठ्या हल्ल्यांशी जोडला गेला होता , ज्यात अमेरिकेतील 9/11 हल्ला, लंडन ट्यूब बॉम्बस्फोट आणि भारतातील दशकांपासूनच्या दहशतवादी घटनांचा समावेश आहे. त्यांनी जाहीर केले की, दहशतवाद्यांनी भारतीय महिलांची प्रतिष्ठा नष्ट करण्याचे धाडस केले असल्याने, भारताने दहशतवादाचे मुख्यालय नष्ट केले आहे. या कारवाईमध्ये 100 हून अधिक धोकादायक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या दहशतवाद्यांमध्ये अनेक दशकांपासून भारताविरुद्ध उघडपणे कट रचणाऱ्या प्रमुख व्यक्तींचा समावेश होता, असे त्यांनी सांगितले. भारताविरुद्ध धमक्या देणार्यांना जलद गतीने निष्क्रिय करण्यात आले आहे, असे ते म्हणाले. मोदी म्हणाले की, भारताच्या अचूक आणि जोरदार हल्ल्यांमुळे पाकिस्तान हताश झाला आणि निराशेच्या गर्तेत गेला. आपल्या आंदोलनात पाकिस्तानने दहशतवादाविरुद्धच्या जागतिक लढाईत सामील होण्याऐवजी एक बेपर्वा कृत्य केले – त्यांनी भारतीय शाळा, महाविद्यालये, गुरुद्वारा, मंदिरे आणि नागरिकांच्या घरांवर हल्ले केले, तसेच लष्करी तळांनाही लक्ष्य केले, असेही ते म्हणाले. त्यांनी या आक्रमकतेने पाकिस्तानच्या असुरक्षिततेला कसे उघड केले, यावर प्रकाश टाकला. त्यांचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे यांना आकाशात निष्क्रिय केले गेले, ते भारताच्या प्रगत हवाई संरक्षण प्रणालींसमोर गवतासारखे कोसळले, असे त्यांनी सांगितले.
येत्या काळात पाकच्या प्रत्येक हालचालीचे मूल्यांकन
पाकिस्तानने भारताच्या सीमेवर हल्ला करण्याची तयारी केली असताना, भारताने पाकिस्तानच्या गाभ्याला निर्णायक धक्का दिला. भारतीय ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी अत्यंत अचूक हल्ले केले, ज्यामुळे पाकिस्तानी हवाई तळांचे गंभीर नुकसान झाले, ज्याबद्दल ते खूप पूर्वीपासून बढाई मारत होते. भारताच्या प्रत्युत्तराच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये पाकिस्तानला अपेक्षेपेक्षा जास्त विनाश सहन करावा लागला. भारताच्या आक्रमक प्रतिउपायांनंतर, पाकिस्तानने तणाव कमी करण्याचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली आणि वाढत्या तणावातून मुक्तता मिळावी यासाठी जागतिक समुदायाला आवाहन केले. त्यांनी खुलासा केला की, मोठ्या प्रमाणात नुकसान सहन केल्यानंतर पाकिस्तानच्या सैन्याने 10 मे रोजी दुपारी भारताच्या डीजीएमओशी संपर्क साधला. तोपर्यंत भारताने मोठ्या प्रमाणात दहशतवादी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त केल्या होत्या, प्रमुख अतिरेक्यांना संपवले होते आणि पाकिस्तानची दहशतवादी केंद्रे उद्ध्वस्त केली होती. मोदी यांनी नमूद केले की, पाकिस्तानने त्याच्या आवाहनात भारताविरुद्ध सर्व दहशतवादी कारवाया आणि लष्करी आक्रमण थांबवण्याची हमी दिली आहे. या विधानाच्या पार्श्वभूमीवर भारताने परिस्थितीचा आढावा घेतला आणि पाकिस्तानच्या दहशतवादी तसेच लष्करी आस्थापनांविरुद्धची प्रति-कारवाई तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पुनरुच्चार केला की हे निलंबन म्हणजे निष्कर्ष नाही – भारत येत्या काळात पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीचे मूल्यांकन करत राहील, याची खात्री करून घेईल की, त्याच्या भविष्यातील कृती त्याच्या वचनबद्धतेशी सुसंगत आहेत.पंतप्रधानांनी भर दिला की भारताची सशस्त्र दले – लष्कर, हवाई दल, नौदल, सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि निमलष्करी दलाच्या तुकड्या – नेहमीच राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करून पूर्णपणे सतर्क राहतात.
अण्वस्त्रांच्या धमक्या देऊन भारताला नमवता येणार नाही
“ऑपरेशन सिंदूर हे आता भारताच्या धोरणात्मक दृष्टीकोनात निर्णायक बदल नोंदवत, दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात भारताचे स्थापित धोरण झाले आहे,” असे घोषित करत ते म्हणाले की या मोहिमेने दहशतवाद प्रतिबंधक उपाययोजनांचे नवे मापदंड निश्चित केले आहेत, नव्या प्रकारची सामान्य स्थिती निर्माण केली आहे. पंतप्रधानांनी भारताच्या सुरक्षाविषयक सिद्धांताच्या तीन महत्त्वाच्या स्तंभांचे स्वरूप सांगितले; पहिला स्तंभ म्हणजे निर्णायक प्रतिरोध, जेव्हा कोणताही दहशतवादी भारतावर हल्ला करेल तेव्हा त्याला प्रखर आणि निश्चयी प्रतिसादाला तोंड द्यावे लागेल. भारत स्वतःच्या अटींवर विरोधाची कारवाई करेल आणि दहशतवादी केंद्रांना मुळापासून उखडून टाकेल. दुसरे म्हणजे अण्वस्त्रांचे नाव घेऊन धमकी देणे; अण्वस्त्रांच्या धमक्या देऊन भारताला नमवता येणार नाही. अशी सबब सांगून कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांच्या कोणत्याही सुरक्षित आश्रयस्थानांना अचूक आणि निर्णायक हल्ल्यांना तोंड द्यावे लागेल. तिसरा मुद्दा म्हणजे दहशतवादाचे पुरस्कर्ते आणि दहशतवादी यांच्यात कोणताही फरक केला जाणार नाही; दहशतवादी नेते आणि त्यांना आश्रय देणारे सरकार यांना भारत वेगेवेगळे घटक मानणार नाही. ऑपरेशन सिंदूर सुरु असताना, संपूर्ण जगाने पुन्हा एकदा पाकिस्तानची सत्यता बघितली की कशा प्रकारे खात्मा झालेल्या दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेला मोठमोठ्या पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांनी खुलेआम उपस्थित राहून पाकिस्तान-पुरस्कृत दहशतवादात पाकिस्तानचा खोलवरचा सहभाग सिध्द केला आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही धोक्यापासून भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी भारत निर्णायक पावले उचलत राहील अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिली.
ऑपरेशन सिंदूरने देशाच्या लष्करी सामर्थ्याला एक नवा आयाम
भारत युद्धभूमीवर पाकिस्तानला सातत्याने धूळ चारत आला आहे आणि ऑपरेशन सिंदूरने देशाच्या लष्करी सामर्थ्याला एक नवा आयाम जोडला आहे असे ठामपणे सांगून मोदी यांनी नव्या युगातील युध्द तंत्रामध्ये देखील आपले वर्चस्व सिद्ध करतानाच भारताने वाळवंटी प्रदेशात आणि डोंगराळ भागातील युद्धात दाखवलेली उल्लेखनीय क्षमता अधोरेखित केली. या मोहिमेदरम्यान आपल्या स्वदेशी संरक्षण सामग्रीची परिणामकारकता सिद्ध झाली यावर त्यांनी अधिक भर दिला. ते म्हणाले की आता जगाला 21 व्या शतकातील युध्द तंत्रातील मोठे सामर्थ्य म्हणून भारतात निर्मित संरक्षण सामग्रीच्या आगमनाचे दर्शन घडते आहे.
सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधातील लढ्यात एकता ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे, यावर भर देताना पंतप्रधानांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले की, हे युग युद्धाचे नाही, तसेच ते दहशतवादाचेही असू शकत नाही. “दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलता ही चांगल्या आणि सुरक्षित जगाची हमी आहे,” असे त्यांनी जाहीर केले.
रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही…
मोदी यांनी स्पष्ट केले की पाकिस्तानचे सैन्य आणि सरकार यांनी सातत्याने दहशतवादाला खतपाणी घातले आहे आणि अशा कृती शेवटी पाकिस्तानच्या स्वतःच्याच विनाशाला कारणीभूत ठरतील. ते म्हणाले की जर पाकिस्तानला टिकून राहायचे असेल, तर त्याला त्यातील दहशतवादाचे अड्डे नष्ट करावेच लागतील — शांतीसाठी दुसरा कोणताही मार्ग नाही. भारत आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगून ते म्हणाले की दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही, दहशतवाद आणि व्यापार दोन्ही एकत्र शक्य नाही, तसेच रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही. जागतिक समुदायाला संबोधित करत त्यांनी पुन्हा एकदा भारताचे दीर्घकालीन धोरण स्पष्ट केले, ते असे की पाकिस्तानसह चर्चेत दहशतवादाचा मुद्दा असेल आणि पाकिस्तानबरोबरच्या वाटाघाटी पाकव्याप्त काश्मिरच्या मुद्द्यावरच होतील.
बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने पंतप्रधानांनी भगवान बुद्धांच्या शिकवणीचा उल्लेख केला आणि सांगितले की शांतीचा मार्ग हा सामर्थ्याने मार्गदर्शित केलेला असावा. ते म्हणाले की मानवजातीने शांती आणि समृद्धीकडे वाटचाल केली पाहिजे, जेणेकरून प्रत्येक भारतीय सन्मानाने जगेल आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करू शकेल. पंतप्रधान म्हणाले की भारताला शांतता टिकवून ठेवायची असेल, तर भारताला मजबूत राहावेच लागेल, गरज पडल्यास आपले सामर्थ्य वापरावे लागेल. त्यांनी नमूद केले की अलीकडच्या काळातील घटनांनी भारताची आपल्या तत्त्वांना धरून ठाम भूमिका घेण्याची तयारी जगाला दाखविली आहे. आपले भाषण संपवताना पंतप्रधानांनी पुन्हा एकदा भारतीय सैन्यदलांच्या शौर्याला सलाम केला आणि भारतीय जनतेने दाखविलेले धैर्य आणि एकतेबद्दल आदर व्यक्त केला.