
पुणे : मित्राला केलेल्या मारहाणीचा जाब विचारल्याचा राग आल्याने चिडलेल्या टोळक्याने एका तरूणावर कोयत्याने वार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कात्रज येथील साईनगरमध्ये १७ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली होती. सोलापूरला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीच्या स्वारगेट पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. स्वारगेट बस स्थानकावर ही कारवाई करण्यात आली. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
समर्थ राकेश सांळुखे (वय १८, रा. संतोषनगर, कात्रज) या तरुणाने फिर्याद दिली आहे. सोन्या कांबळे, अमोल रवी आडम (वय २४, रा. शंकरनगर, कात्रज), अमोल मदनकर, गणेश दोडमणी, चिक्का व इतर दोन अनोळखी यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्याचा मित्र इशांत कोकाटे या दोघांना आरोपींनी मारहाण केली होती. त्याचा जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर सोन्या कांबळे याने ‘तू आम्हाला जाब विचारणारा कोण?’ असे म्हणून त्याने अन्य आरोपींना बोलावून घेतले.
घटनास्थळी आलेल्या आरोपींकडे कोयते होते. सोन्या कांबळे याने इशांत कोकाटे याच्या मानेवर वार केला. तो खाली कोसळल्यावर फिर्यादी व त्याचे साथीदार जीव वाचविण्यासाठी पळू लागले. त्यावेळी समर्थ साळुंखे याचा पाय घसरल्याने तो खाली पडला. तेव्हा त्याचा पाठलाग करणार्या गुंडांनी त्याच्या डोक्यावर, हातावर व अंगावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरु केला.
स्वारगेट पोलीस ठाण्यातील हवालदार कुंदन शिंदे, पोलीस अंमलदार राहुल तांबे यांना, आरोपी अमोल आडम हा सोलापूरला पळून जाणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी स्वारगेट एस. टी. बसस्थानकात सापळा रचत आडमला पकडले. आडम हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर भारती विद्यापीठ, येरवडा, विश्रांतवाडी, कोंढवा या पोलीस ठाण्यांमध्ये अपहरण, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, गंभीर दुखापत यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली होती. त्याची नुकतीच सुटका करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोळंबीकर, सहायक फौजदार संजय भापकर, पोलीस अंमलदार कुंदन शिंदे, शंकर संपते, सागर केकाण, राहुल तांबे, श्रीधर पाटील, सुधीर इंगळे, सतीश कुंभार, विक्रम सावंत, रफीक नदाफ, शरद गोरे यांनी केली आहे.