
कोंढवा पोलीस ठाण्यात अल्पवयीनावर गुन्हा दाखल
पुणे : अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्या आहेत. विशेष म्हणजे यामध्ये अल्पवयीन आरोपींचे प्रमाण देखील लक्षणीय आहे. अशाच एक खळबळ उडवून देणारा प्रकार कोंढवा परिसरातून समोर आला आहे. एका अवघ्या नऊ वर्षांच्या मुलाने साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी संबंधित मुलावर गुन्हा दाखल केला आहे.
पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी अल्पवयीन मुलगा आणि पिडीत मुलगी एकाच भागात राहण्यास आहेत. त्यांची घरे समोरासमोर आहेत. फिर्यादीचे कुटुंब मागील दोन वर्षांपासून कोंढवा परिसरात राहण्यास आहे. तर, आरोपी मुलाचे कुटुंब त्यांच्या समोरच्या सदनिकेत राहते. पिडीत मुलगी नर्सरीमध्ये शिकण्यास आहे. रविवारी फिर्यादी महिला घरात केलेली भाजी शेजाऱ्यांना देण्यासाठी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास आरोपी मुलाच्या घरी गेली. त्यावेळी त्यांच्या घरामध्ये आरोपी मुलगा आणि फिर्यादीची ३ वर्षे ७ महिन्यांची मुलगी होती. हे दोघेही अभ्यास करीत बसलेले होते.
भाजी देण्याकरिता आरोपी मुलाच्या घरी गेलेली पिडीत मुलीची आई साधारण नऊ वाजण्याच्या सुमारास परत आली. थोड्या वेळाने आरोपी मुलगा त्याच्या घरी निघून गेला. फिर्यादीने त्यानंतर मुलीला जेवायला बसवले. तिला जेवण वाढत असताना पिडीत मुलगी ‘आई मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. ती पप्पांना सांगू नको.’ असे म्हणाली. फिर्यादीने तिला विश्वासात घेऊन विचारपूस सुरू केली. तेव्हा मुलीने सांगितलेला प्रकार ऐकून त्यांना धक्का बसला. त्यावेळी तिने आरोपी मुलाने तिच्यासोबत केलेल्या अश्लील कृत्याची माहिती दिली.
आरोपी मुलाने स्वत:चे आणि पिडीत मुलीचे कपडे काढून तिच्यावर बलात्कार केला. तसेच, अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. पिडीत मुलीने आपल्याला दुखत असल्याचे सांगितले. ही माहिती समजताच फिर्यादीने पतीशी संपर्क साधला. त्यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांशी संपर्क साधून याविषयीची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ‘हे प्रकरण संवेदनशील आहे. याविषयी अधिक बोलणे उचित होणार नाही. आम्ही तपास करीत आहोत. मात्र, मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. आईवडिलांनी मुलांच्या हालचालींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मुलांवर चांगले संस्कार करण्यावर भर द्यायला हवा.’