
श्वेता मोरे
तमाशा प्रधान चित्रपटांचा कोहिनुर शोभावा असा शांताराम बापुंचा ‘पिंजरा’ काही वर्षांपूर्वी नव्या स्वरुपात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात काम केलेल्या किंवा चित्रपटाशी संबंध आलेल्यांच्या आठवणी काही ना काही निमित्ताने समोर येतच असतात. या सिनेमातील अभिनेत्री-अभिनेते, कथानक, संगीत सर्वांचे कौतुक झाले. ते आजही होतेच आहे. मात्र, एक गायक एवढ्या वर्षांनंतरही उपेक्षितच राहिला. त्याचं नाव… ‘वाघ्या’
उपेक्षिताचे जिणे जगणारा ‘वाघ्या’ अर्थात विष्णू वाघमारे आजही उपेक्षितच आहेत. विष्णू वाघमारे यांचे वडील बीड जिल्ह्यामधले रहिवासी. दलित समाजातील जन्म. पाचवीला पूजलेले दारिद्र्य… सटवीने भाळी लिहिलेली सामाजिक उपेक्षा हीच काय ती त्यांची ओळख. पोटाची आग शमवण्यासाठी वाघमारे कुटुंबाने पुण्याची वाट धरली. पुण्यातल्या खडकी घाटावर आपली झोपडी थाटली. पोटासाठी कामधंदा शोधत शोधत मोलमजुरीवर त्यांची गुजराण सुरु होती. लेकराबाळांची पोटं कशी भरायची असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. वाघमारे दाम्पत्याला १५ जानेवारी १९३२ रोजी मुलगा झाला. मोठ्या आवडीने त्याचे नाव विष्णू ठेवण्यात आले. त्यांच्या आईला दरम्यानच्या काळात आरोग्य विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून नोकरी लागली होती.
लहानपणापासूनच कलेची आवड असलेला विष्णू जसजसा मोठा होऊ लागला तसतसा त्याचा गळा खुलू लागला. राष्ट्र सेवा दलाच्या संपर्कात तो आला. कोणत्याही शिक्षण आणि सरावाशिवाय लागणारा विष्णूचा आवाज आणि त्याचा अभिनय लोकांना आकर्षित करु लागला. सेवा दलाच्या पथनाट्य आणि मेळ्यांमध्ये विष्णू गाऊ लागला. आपल्या पहाडी आवाजाची फेक त्याला माहिती होती. अनेक जलशांमध्ये त्यांचे गाणे आवर्जून ऐकायला लोक यायचे. याच कामातून त्याचा संपर्क निळू फुले, राम नगरकर, राम डवरी, वसंत अवसरीकर, दादा कोंडके यांच्यासोबत आला. प्रसिद्ध पटकथा लेखक आणि दिग्दर्शक अनंत माने यांनी १९५६ साली प्रदर्शित झालेल्या ‘सांगत्ये ऐका’ या चित्रपटात विष्णूला पहिली संधी दिली. त्या काळी नावांपेक्षा आडनावाने माणसे ओळखायची पद्धत असल्यामुळे वाघमारेवरून त्यांचा ‘वाघ्या’ झाला. सर्व जण त्यांना वाघ्या म्हणूनच हाक मारायचे. ‘सांगत्ये ऐका’मध्ये हंसा वाडकर, जयश्री गडकर अशा तत्कालीन प्रख्यात अभिनेत्रींसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांना सोंगाड्याची भुमिका मिळत गेली. ती त्यांनी आनंदाने स्वीकारली. अनंत माने यांनी वाघ्याला तब्बल ४० चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी दिली.
त्यांची आई निवृत्त झाल्यावर त्याला आईच्या जागेवर पुणे महापालिकेमध्ये बिगारी म्हणून नोकरी मिळाली. चतुर्थ श्रेणी कामगार म्हणून काम करित असतानाही वाघ्याने आपली कला जोपासली होती. याच काळात ‘पिंजरा’ सिनेमाचे काम सुरू झाले होते. शांताराम बापूनी ‘पिंजरा’ चित्रपटासाठी राम कदम यांना संगीत देण्यास सांगितले. जगदीश खेबुडकरांनी या चित्रपटासाठी तब्बल ११० गाणी लिहिली. राम कदमांनी १०० पेक्षा अधिक चाली बांधल्या. त्यातली ११ गाणी चित्रपटात घेण्यात आली. ‘ग साजणी…आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत हिरव्या रानी…’ ही जगदीश खेबुडकरांनी लिहिलेली शब्दरचना शांतारामबापूंना कमालीची आवडली. त्यांच्या डोळ्यासमोर या गाण्याचे चित्रीकरणच उभे राहिले. शांताराम बापू कोल्हापुरला असत. तर, राम कदम पुण्यात आणि रेकॉर्डिंग व्हायचे मुंबईला. बापूना ‘टायटल साँग’साठी विशेषत: निळू फुलेंसाठी हे गाणे हवे होते.
त्यासाठीची चाल बापूना पसंत पडत नव्हती. शांताराम बापूंच्या सल्ल्यानुसार सर्वजण कोल्हापुरात असताना एकदा हास्यविनोद सुरु होते. त्यावर बापूंनी हास्यविनोदापेक्षा गाणी बजावणी करा असे म्हणताच राम कदमांनी एक लकेर घेतली. ही लकेर ऐकताच बापूना पसंत पडली. हीच चाल हवी असे त्यांनी सांगताच खेबुडकरांनी त्या चालीवर गाणे लिहिले. आता प्रश्न गायकाचा आला. अनेकांकडून हे गाणे गाववून घेतले तरी ते बापूंना पसंत पडेना. पूर्ण चित्रपटाचा डोलारा पेलणारे हे गाणे गाणार कोण असा प्रश्न निर्माण झाला. या गीताला न्याय देऊ शकणारा आवाज हवा होता. गायक महेंद्र कपूर यांच्यापासून ते चंद्रशेखर गाडगीळ यांच्यापर्यंतची अनेक नावे चाचपली गेली. परंतु, यापैकी आवाजावर शांतारामबापूंची पसंती येईना. हा नको तो असे करत करत जयवंत कुलकर्णी यांच्या कडून गाणे गाऊन घ्यायचे असे ठरले.
त्यावरही शांतारामबापूंनी एक देखणा आक्षेप नोंदवला. त्यांना तमाशाप्रधान चित्रपटात बाणातला ‘ण’ म्हणणारा गायक नको होता. तर, नळातला ‘न’ उच्चारणारा गायक अपेक्षित होता. त्यांनी आणखी काही गायकांचा विशेषत: नव्या गायकांचा शोध घेण्याची सूचना संगीतकार राम कदम यांना केली. दरम्यान, पुणे महानगरपालिकेच्या एका सांस्कृतीक कार्यक्रमाला राम कदम यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलेले होते. याच कार्यक्रमात लोकसंगीताच्या बाजातील गाणी गाणाऱ्या एका गायकाला त्यांनी पाहिले. त्यांच्या आवाजाने मोहिनी घातली. पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे त्यांनी या गायकाबाबत चौकशी केली. त्यांनी ‘वाघ्या’ची ओळख करून दिली. हा पालिकेचा सफाई कामगार आहे. पण आवाज मात्र पहाडी. तो आमच्या विविध कलापथकात, शाहीरी पार्टीत झिलकरी म्हणून साथसंगत करतो असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कार्यक्रम संपल्यावर राम कदम यांनी त्याची भेट घेत कौतूक केले. आयुक्तांकडे विनंती करून तीन-चार दिवसांची रजा मंजूर करून घेतली. दुसऱ्या दिवशी आपल्या गाडीतून वाघ्याला मुंबईला घेऊन गेले. राजकमल स्टुडिओमध्ये शांतारामबापूंच्या समोर त्याला उभे करीत हा आणला नवा गायक असे म्हणाले. शांताराम बापूंना पाहून बावरलेला वाघ्या गप्पच होता. राम कदमांनी त्याला आधी गाण्याची कल्पना दिलीच होती. त्याच्याकडून ‘ग साजणी…’ ची तालीम करून घेतली. गाणं आणि सिनेमातील प्रसंग समजावून सांगितलं. विष्णूची ट्रायल घेतली आणि दुसऱ्या दिवशी रात्री रेकॉर्डींग रूममध्ये गाणं रेकॉर्ड झाले. त्याने गायलेलं गाणं ऐकून शांतारामबापू धावत त्याच्याजवळ गेले आणि त्याला कडकडून मिठी मारली. म्हणाले, हे गाणं तुझ्या आवाजात अजरामर होईल. ‘पिंजरा’तल्या सगळ्याच गाण्यात कोरस मध्ये आणि ‘झिल’मध्ये त्याचाच आवाज आहे. राम कदम यांनी पहिल्यांदा मराठी चित्रपट संगितामध्ये ‘झील’ हा प्रकार वापरला. वाघ्या व मल्लेश यांनी ही ‘झील’ गाऊन राम कदमांच्या मनात जागा निर्माण केली. राम कदमांसोबत वाघ्या हे समिकरण बनलं होतं.
याच सिनेमात ‘दे रे कान्हा चोळी अन लुगडी’ या गाण्या आधी ‘ऐका चतुरा अध्यात्माची कहाणी’ हे शब्द आहेत. लता मंगेशकरांनी हे गाणे गाण्याआधी हे वर्डिंग कोण गाणार असे विचारले. त्यावर त्यांनी वाघ्याचे नाव सुचवले. दीदींनी शंका उपस्थित केली मात्र रेकॉर्डिंगच्या वेळी एकाच टेकमध्ये वाघ्याने आपल्या आवाजाची ताकद दाखवून दिली. दीदीच्या पायावर डोके ठेवून त्यांनी नमस्कार केल्यावर दीदींनी त्यावेळी काही रुपयांचे बक्षिस दिले. कोणतीही सांगितीक पार्श्वभुमी नसतानाही वसंत पवार, राम कदम, सुधीर फडके, विश्वनाथ मोरे, बाळ पळसुले यांच्यासाठी त्यांनी कोरस, सोलो गाणी गायली. चंदनाची चोळी अंग अंग जाळी, झुंज या चित्रपटात त्यांना अभिनयाची संधी मिळाली. दादा कोडकेंच्या सोंगाड्या, आंधळा मारतो डोळा आदी चित्रपटांमध्ये उषा मंगेशकर यांच्यासोबत कोरसमध्ये साथ दिली.
दैवाच्या फेऱ्यात अडकलेल्या वाघ्याच्या नशीबी पैसा मात्र फारसा आला नाही. त्याने जपलेल्या कलेमुळे जेमतेम भागत होते. दरम्यान, पानशेत धरण फुटल्यामुळे १९६२ साली वाघ्याचे कुटुंब सहकारनगर येथील लक्ष्मीनगरमध्ये रहायला आले. त्यांना दोन मुले आणि दोन मुली झाल्या. त्याच्या कुटुंबियांनाही दारिद्र्याचा सामना करावा लागला. या धावपळीत कुटुंबाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे मुलांना शिकवता आले नाही. शेवटी मुलेही पालिकेत बिगारी म्हणून रुजू झाली. कोरस गाणारा हा कलाकार शेवटपर्यंत ‘कोरस’मध्येच राहीला. कष्टकरी आणि उपेक्षितांच्या कला तशाही नेमकी उपेक्षितच राहिलेल्या आहेत. त्यांना ना पुरेसी संधी मिळाली ना प्रसिद्धी. राम कदम त्याला ‘वाघ्या’ म्हणायचे. त्यामुळे तेच नाव एचएमव्ही कॅसेट आणि रेकॉर्डवर, पिंजरा टायटलमध्ये आले. विष्णू वाघमारे हे त्याचं खरं नाव मात्र अंधारात राहिले. पालिकेचा चतुर्थश्रेणी मागासवर्गीय कर्मचारी मराठी चित्रपटांमध्ये आपली वेगळी छाप सोडतो आणि तरी देखील तो दुर्लक्षितच राहतो. या कलाकाराची वार्धक्याच्या काळात देखील कोणीही दखल घेतली नाही. उपेक्षितांचं जगणं जसं उपेक्षित असतं तसंच त्यांचं मरणं देखील उपेक्षितच राहतं. या वाघ्याचा जन्म १५ जानेवारीचा आणि मृत्यू देखील १५ जानेवारीचाच.