
विदेशात अडकून पडलेल्या भारतीयांना तसेच मृतदेहांना मायदेशी आणणारी चळवळ
पुणे : जगभरात प्रवासी भारतीयांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. फसव्या एजेंटकडून दिल्या जाणाऱ्या खोट्या नोकरीच्या प्रलोभनांना बळी पडून विदेशात गेलेले आणि तिथेच अडकून राहिलेल्या लोकांची संख्या वाढत चालली आहे. या विदेशात अडकून पडलेल्या लोकांना तसेच विदेशात मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह भारतात कुटुंबियांपर्यंत पोहचविण्याचे अनोखे काम रेस्क्यूइंग एव्हरी डीस्ट्रेस्ड इंडियन ओव्हरसीज अर्थात रेडिओ ही संस्था करीत आहे.
या संस्थेच्या विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून धनश्री वाघ-पाटील काम करतात. त्या मूळच्या पुण्याच्या रहिवासी आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र शासनमान्य संस्था त्यांनी चालू केली आणि त्या माध्यमांतून अनेक महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत केली. त्याच दरम्यान लग्नानंतर त्यांचे पती कमलेश पाटील यांच्या नोकरी संदर्भात धनश्री यांना दुबई येथे स्थायिक व्हावे लागले. दुबई येथील १० वर्षाच्या वास्तव्यात त्यांनी सेलिब्रेशन इव्हेंटच्या माध्यमातून अनेक इव्हेंट केले. स्वतःचा व्यवसाय सुरळीत सुरू असतानाच त्यांच्या आयुष्यात अचानक एक वळण आले. विदेशातील अडचणीत असलेल्या लोकांना मदत करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांना समजले. मार्च २०२० मध्ये जगभरात कोविडचे संकट आले आणि दुबई-भारत विमान सेवा बंद झाली. वंदे भारत मिशन अंतर्गत बाकी सर्व राज्यात विमान सेवा चालू झाली. पण महाराष्ट्रासाठी काही विमानसेवा चालू होत नव्हती.
त्यामुळे जवळ जवळ ६ हजार महाराष्ट्रीय नागरिक अडकून पडले होते. यात एक गर्भवती महिला, वयोवृद्ध पालक, अनेक मेडिकल इमर्जन्सी असलेले पेशंट होते. या सर्व लोकांना मदत करण्यासाठी धनश्री यांनी पुढाकार घेतला. ह्या लोकांना व्हॉट्सॲप ग्रूप च्या माध्यमातून एकत्र आणले. अनेक लोकांची नोकरी गेली होती. त्यांना किराणा पुरविणे, मोफत वैद्यकीय सुविधा पुरविणे, काहींचे घराचे भाडे भरणे हे कार्य त्यांनी दुबईमधील सामाजिक संस्थांच्या मदतीने केले. दुबईमधील व्यावसायिक राहुल तुळपुळे यांच्या सहकार्याने महाराष्ट्रमध्ये पहिल्या दोन चार्टर फ्लाईटचे आयोजन केले. तसेच दुबई मधील अल आदिल ट्रेडिंगचे धनंजय दातार यांच्या मदतीने हजारो भारतीय मजुरांना मोफत भारतात येण्यास मदत केली. धनश्री यांचा नंबर फक्त दुबईमध्ये नाही तर सौदी मधील कामगार वर्गापर्यंत पोहचला. लोकांचे भारतात येण्यासाठी मदत मागण्यासाठी अनेक फोन येऊ लागले. हे सर्व मदत कार्य धनश्री परराष्ट्र मंत्रालयाचे माजी सचिव आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या मार्गदर्शनाने करू लागल्या. परंतु याचा कामाच्या जगभरातील विस्तारासाठी रेडिओ संस्थेची जबाबदारी धनश्री यांच्या वर सोपविली.
भारतातील ३ कोटी पेक्षा जास्त लोक विदेशात राहतात. हे लोक वेगवेगळ्या कारणांनी विदेशात संकटात सापडतात कधी त्यांना फसविले जाते. अनेकांचे पासपोर्ट कंपनी मालकाकडून जप्त केलेले असतात. काही लोक निर्दोष असताना देखील तुरुंगात अडकतात. अशा लोकांना मदत करण्याकरिता भारत सरकार तत्पर असते. पण, अशा वेळी नक्की मदत कुठून आणि कशी मिळेल हे अनेक लोकांना माहीत नसते. अशा वेळी या लोकांना योग्य दिशा देऊन भारतीय दूतावास व संस्थेचे विदेशातील सल्लागार यांच्या मदतीने अनेक भारतीयांना भारतात परतण्यास मदत करण्यात आली आहे. रेडिओचे कार्य दुबई, शारजाह, संपूर्ण आखाती देशात, सौदी अरेबिया, कॅनडा , लंडन, पोलंड, साऊथ आफ्रिका, सिंगापूर, मलेशिया, थायलंड,चीन, अमेरिका , जर्मनी अशा अनेक देशांमध्ये सुरू आहे. अनेक वेळा विदेशात नोकरी, व्यवसाय, मजुरी, शिक्षण यासाठी गेलेल्यांमधील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो. महिने उलटले तरीदेखील कुटुंबीयांचा संपर्क होऊ न शकल्याने हे मृतदेह परदेशात अडकून पडतात. असे मृतदेह मायदेशी परत असून कुटुंबियांकडे देण्याची प्रक्रिया संस्थेने सुरू केली आहे.
आखाती देशात २ महिने एका मृत व्यक्तीचा मृतदेह अडकून पडलेला होता. भारतातील त्याच्या नातेवाईकांचा शोध न लागल्याने आखातातील रुग्णालयात २ महिने अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत हा मृतदेह होता. ‘रेडिओ’ टीम च्या सहकार्याने त्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा अवघ्या एक तासात शोध घेण्यात आला. ही व्यक्ती केरळमध्ये रहाणारी होती. त्याच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्या मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराची कागदोपत्री औपचारिकता पूर्ण करण्यात आली.
नुकतेच मालदीव येथे एका तरुणाचा हृदय विकाराने मृत्यू झाला. रेडिओचे मालदीवचे सल्लागार कर्नल विनो यांनी धनश्री पाटील यांना संपर्क करून त्याची माहिती दिली. मात्र, या व्यक्तीच्या कुटुंबीयांचा फोन नंबर मिळत नसल्याने मृतदेह पाठविण्याचे काम थांबले होते. मात्र, त्याच्या गावातील पत्ता उपलब्ध होता. धनश्री यांनी तेलंगनाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांना संपर्क केला. त्यानंतर महेश भागवत व त्यांच्या सहकाऱ्यांच्या साहाय्याने २० मिनिटात कुटुंबीयांसमवेत संपर्क झाला. त्यानंतर हा मृतदेह भारतात आणण्याचे सर्व सोपस्कार पार पडले.
नोकरी व्यवसाय अथवा शिक्षण अधिकारांसाठी विदेशात गेलेल्या नागरिकांना अनेक भारतीय संस्था मदत करीत असतात. परंतु, विदेशामध्ये अडकून पडलेल्या मृतदेहांना भारतामध्ये आणण्याचे आगळे वेगळे काम ही संस्था करीत आहे. या संस्थेने आतापर्यंत अनके मृतदेह भारतात आणून त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्त केले आहेत. जेणेकरून त्यांच्या संस्कृतीनुसार या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करता येतील. अनिवासी भारतीय पुरस्कार विजेते या संस्थेचे सल्लागार आहेत.
काही महिन्यांपूर्वी आळंदी येथील एक तरुणी तिच्या मैत्रिणीसह दुबई येथे नोकरीसाठी गेली होती या तरुणीने दुबई मध्ये गेल्यानंतर वैयक्तिक कारणातून आत्महत्या केली या संदर्भात त्या तरुणीने कुटुंबीयांना माहिती कळविले मात्र कुटुंबीयांनी तिनेच आपल्या मुलीचे काहीतरी बरे वाईट केले असा गैरसमज करून घेतला घाबरलेल्या त्या तरुणीने नंतर स्वतःचा फोन बंद केला आणि सर्व संपर्क तोडून टाकले दरम्यान तिच्या मदतीकरिता तिचा नवरा देखील दुबईला पोहोचला ही माहिती रेडिओ संस्थेला समजल्यानंतर नक्की काय झाले आहे आणि तो मृतदेह भारतात आणावा याकरिता प्रयत्न सुरू केले दरम्यान सौ धनश्री पाटील यांनी तिचा नवीन नंबर मिळून तिला विश्वासात घेऊन विचारपूस करण्यात आले तिला योग्य बाब मार्गदर्शन केले पोलिसांच्या व भारतीय दूतावासाच्या मदतीने आठ-दहा दिवसांमध्ये सर्व सोपस्कार पूर्ण करून आत्महत्या केलेल्या तरुणीचा मृतदेह पुण्यात आणून तिच्या आई-वडिलांकडे सुपूर्त करण्यात आला.
रेडिओ या संस्थेने रशिया-युक्रेन युद्धाची ठिणगी पडल्यानंतर युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना सोडवून आणण्यासाठी देखील मोठी मदत केली. युक्रेनमध्ये या संस्थेने २४ बाय ७ मदतीसाठी नंबर दिला होता. पालक आणि विद्यार्थ्यांशी संपर्क साधून जवळपास ४८०० विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यात या संस्थेला यश आले. नुकतेच रेडिओ संस्थेने ओमान येथे अडकलेल्या ४८ कामगारांना भारतात परत आणण्याचे मदत कार्य केले आहे.
आखाती देशांसह विविध राष्ट्रांमध्ये मोलकरीण म्हणून कामासाठी गेलेल्या अनेक महिलांना त्या ठिकाणी शारीरिक शोषणासोबतच अन्य प्रकारच्या शोषणाला बळी पडावे लागते. अनेक कामगारांचे पासपोर्ट एजंट काढून घेतात. त्यांना मायदेशी देखील परत येता येत नाही. अनेक तरुण नोकरीसाठी विदेशामध्ये नेली जातात. आणि तिथे मात्र, त्यांना नोकरी लावली जात नाही आणि त्यांचे पासपोर्ट सुद्धा परत मिळत नाहीत. अशावेळी त्या देशांमध्ये अडकून पडण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. अशा विद्यार्थी, महिला, कामगार आणि मोलकरणी यांना देखील या संस्थेकडून मदतीचा हात दिला जातो. त्यांना मायदेशी परत आणण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली जाते.
जगभरात प्रवासी भारतीयांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेकजणांची एजंटकडून फसवणूक केली जाते. महिलांची तर अनेक प्रकारे छळवणूक केली जाते. अलीकडच्या काळात विविध अडचणींमुळे भारतीयांचे मृतदेह परत आणण्यात अनेक अडचणी येत आहेत. या सर्व समस्यांवर २२ देशात ‘रेडिओ’ संस्था काम करीत आहे. आजवर अनेक मृतदेह भारतात परत आणून त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोचविण्यात संस्थेने दुवा म्हणून भूमिका बजावली आहे. यासोबतच अनेक महिलांची सुटका केली आहे.