
ठेकेदाराचे उखळ पांढरे होत असल्याने मुख्यमंत्र्यांकडून निर्णयाला स्थगिती
मुंबई : राज्य परिवहन महामंडळासाठी १ हजार ३१० बसेस ७ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर चढ्या दराने घेण्याच्या चार महिन्यांपूर्वीच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच स्थगिती दिली. महामंडळाने ठेकेदारांवर विशेष मेहरबानी दाखवताना प्रति किलोमीटर १२ रुपये अधिक दर ठरवून इरादापत्र दिले होते. या दरामुळे महामंडळाचे सुमारे दोन हजार कोटींचे नुकसान होण्याची शक्यता दिसल्याने फडणवीस यांनी या निर्णयाला ब्रेक लावल्याचे सांगितले जाते. मूळ निर्णय चार महिन्यांपूर्वीचा असल्याने यानिमित्ताने सत्ताधाऱ्यांमधील छुपे युद्ध उघड झाल्याचे मानले जाते.
राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना पुरेशा बस उपलब्ध करून देण्यासाठी नवीन बस खरेदीबरोबरच प्रति किलोमीटर दराने भाडेतत्त्वावर बस घेण्याचा निर्णय केला. एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या १४ हजारांहून अधिक बस आहेत. मात्र, यातील अनेक बस मोडकळीस आल्या असून मागणीप्रमाणे नव्या बस खरेदी करणे शक्य नसल्याने भाडेतत्त्वावर घेऊन सध्या गरज भागवली जात आहे. सप्टेंबर महिन्यात १ हजार ३१० बसेस भाडेतत्त्वावर घेण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार, मुंबई आणि पुणे विभागासाठी ४५० बस, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागासाठी ४३० तसेच अमरावती आणि नागपूर विभागासाठी ४६० बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार होत्या.
भाडेतत्त्वावरील १ हजार ३१० बसगाड्यांची संख्या आणि ७ वर्षांचा कालावधी तपासला असता पुढील सात वर्षांत महामंडळाचे सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले असते व ठेकेदारांचे उखळ पांढरे झाले असते. सध्या एसटी महामंडळ तोट्यात आहे.
राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी जनतेच्या करातील म्हणजेच राज्याच्या तिजोरीतून पैसे देते. एकीकडे कर्मचाऱ्यांना वेळेत व पुरेसा पगार मिळत नसताना ठेकेदाराचे हित का साधले जात होते ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या व्यवहाराची चर्चा रंगली असतानाच फडणवीस यांनी या निर्णयाला ब्रेक लावला आहे. या धाडसी निर्णयामुळे महामंडळाचे २ हजार कोटी रुपये वाचणार असल्याची भावना एसटी कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
एसटीच्या ताफ्यात १ हजार ३१० भाडेतत्त्वावरील बस घेण्याचा निर्णय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळातील आहे. या बसगाड्या भाडेतत्त्वावर घेतल्या असत्या, तर त्यात भ्रष्टाचार झाला असता, असे म्हणता येईल. हा संभाव्य भ्रष्टाचार फडणवीस यांनी थांबवला आहे. एसटी महामंडळाच्या व राज्यातील जनतेच्या हिताचा निर्णय फडणवीस यांनी घेतला. त्याचे मी स्वागत करतो. सत्ताधाऱ्यांतील छुपे युद्ध सुरू झाले आहे. असे चुकीचे अनेक निर्णय भविष्यात बदलले जातील, असे महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी म्हटले आहे.