
जखमींमध्ये काही एमपीएससीचे विद्यार्थी; चालकासह तिघेजण ताब्यात
पुणे : पुण्याच्या मध्यवर्ती भागातील सदाशिव पेठेतील भावे स्कूल समोर भरधाव चारचाकीने बारा जणांना उडविले. या अपघातात बाराही जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांपैकी काही जण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत. यापैकी दोन ते तीन जण गंभीर जखमी असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. शनिवारी (३१ मे) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास एका टी स्टॉलवर हे विद्यार्थी चहा पित उभे होते. तेव्हा हा अपघात घडला. या अपघातानंतर चालक, सहप्रवासी तसेच कारमालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. चालक आणि सहप्रवासी हे मद्यधुंद अवस्थेत असण्याची शक्यता पोलीसांकडून वर्तवण्यात आली आहे.
कारचालक जयराम शिवाजी मुळे (वय २७, रा. बिबवेवाडी), सहप्रवासी राहुल गोसावी (वय २७) आणि कार मालक दिगंबर शिंदे (वय २७) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तर, अविनाश दादासो फाळके, प्रथमेश पांडुरंग पतंगे, संदीप सुनील खोपडे, सोनाली सुधाकर घोळवे , मंगेश आत्माराम सुरवसे, अमित अशोक गांधी, समीर श्रीपाद भालचिकर, सोमनाथ केशव मेरूकट, प्रशांत ब्रह्मदेव बंडगर, किशोर हरिभाऊ भापकर, पायल आदेश कुमार दुर्गे , गुलनाज सिराज अहमद असे जखमी झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास भावे स्कूलच्या समोरील एका टी स्टॉल च्या समोर चहा पित उभे असलेल्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना भरधाव वाहनाने उडविले. एमएच १३ ईपी ०३५४ असा या कारचा क्रमांक आहे. या अपघातात १२ जण जखमी झाले. जखमींना तत्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
चालक मद्यधुंद अवस्थेत असण्याची शक्यता
चालक जयराम मुळे आणि त्याचा सहप्रवासी राहुल गोसावी हे दोघे मद्यधुंद अवस्थेत असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मद्यधुंद अवस्थेत चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर टी स्टॉलच्या समोरील काही लोकांना तसेच वाहनांनी त्याने उडविले. दरम्यान, काही जखमींच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दोन ते तीन जण गंभीर जखमी असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
काय म्हणाले स्थानिक आमदार
भावे हायस्कूलजवळ झालेल्या अपघातातील जखमींमध्ये १२ जणांपैकी काही विद्यार्थी असून ते स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. त्याची एक परीक्षा उद्या होणार असल्याने या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलणे झाले असून विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचा शब्द त्यांनी दिला आहे. तसेच जखमींचा सर्व खर्च हा सरकारच्या माध्यमातून करण्यात येईल.
-हेमंत रासने, आमदार कसबा विधानसभा
पोलिसांचा तपास काय सांगतो?
जखमी १२ ही जणांचे जबाब घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. अजूनही दोन ते तीन जण रुग्णालयात आहे. चार ते पाच जणांना फ्रॅक्चर आहे. बाकीचे लोक जखमी आहेत. कारचालकासह सहप्रवासी दोघेही दारू पिले असण्याची शक्यता आहे. चालक, सहप्रवासी आणि गाडी मालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. गाडीचा मालक आणि चालक यांच्यामधील कराराची कागदपत्रे तपासून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सूरू आहे.
– निखिल पिंगळे, पोलीस उपायुक्त, गुन्हे (प्रभारी परिमंडळ १)