
ताम्हीणी घाटातील दुर्घटना : पुण्यातील चाकणवरुन महाड येथे निघाली होती बस
पुणे : लोहगाववरुन रायगड जिल्ह्यातील महाड येथे लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या बस भीषण अपघात झाला असून या अपघातात पाच प्रवासी जागीच ठार झाले असून अंदाजे १३ प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी सकाळी साधारण साडेनऊ ते दहाच्या दरम्यान ताम्हीणी घाटात एका वळणावर घडला. वळण घेत असताना ही बस खोल दरीत जाऊन कोसळली. या बसमध्ये अंदाजे ४० प्रवासी होते असे पोलिसांनी सांगितले.
संगिता धनंजय जाधव, गौरव अशोक दराडे, शिल्पा प्रदिप पवार, वंदना जाधव, अनोळखी पुरुषाचा या अपघातात मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यातील माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ताम्हीणी घाटामधून पर्पल ट्रॅव्हल्सची खाजगी बस (MH. 14 GU. 3405) निघालेली होती. बस चालकाचे घाट वळणावर बसवरील नियंत्रण सुटले. ही बस उलटल्याने गंभीर अपघात घडला. जाधव कुटुंबीय लोहगाव येथून महाड तालुक्यातील बिरवाडी येथे लग्न समारंभास निघालेले होते. ताम्हीणी घाटातील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस उलटली. या अपघातात २ पुरुष व ३ महिला अशा एकूण ५ जणांचा मृत्यू झाला आहे. २७ जखमी लोकांना बाहेर काढून माणगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. बचाव पथक आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत व बचाव कार्य सुरू केल्याची माहिती रायगडचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली.