
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तपासणीमध्ये समोर आला निष्कर्ष
#पुणे : दिवाळीच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले गेले. यंदा धुराचे प्रमाण देखील वाढल्याचे पहायला मिळाले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीतून एक धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. दिवाळीच्या काळात पुण्यामधील हवा विषारी बनल्याचे या निष्कर्षात नमूद करण्यात आले आहे. या काळात हवेची प्रदूषण पातळी मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे एमपीसीबीच्या आकडेवारीतून समोर आले आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिवाळीच्या काळात शहरामधील विविध ठिकाणी हवेची तपासणी करणारी यंत्रे बसविली होती. साधारण ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते १ नोव्हेंबर दुपारी १२ आणि १ नोव्हेंबर दुपारी १२ ते २ नोव्हेंबर दुपारी १२ अशा दोन दिवसांचे हवेचे नमुने तपासण्यात आले. पहिल्या दिवशी नरक चतुर्दशी होती. तर, दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन होते. शनिवारवाडा परिसरात एमपीसीबीने केलेल्या तपासणीत पहिल्या दिवशी पीएम १० या सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण सरासरी १३५.१९ होते. हेच प्रमाण दुसऱ्या दिवशी वाढून तब्बल ३९५.९६ वर पोहोचले. दुसऱ्या दिवशी रात्री १२ वाजता हे प्रमाण १ हजार ५९९ या उच्चांकी पातळीवर पोहोचले होते. तसेच, पीएम २.५ या सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण पहिल्या दिवशी ५१.३२ होते; ते दुसऱ्या दिवशी १४० वर गेले. हे प्रमाण दुसऱ्या दिवशी रात्री १२ वाजता ५४९ वर गेले होते. सल्फर डाय ऑक्साईडचे प्रमाण पहिल्या दिवशी १३.७६ होते आणि दुसऱ्या दिवशी १७.२० नोंदविण्यात आले. हे प्रमाण दुसऱ्या दिवशी रात्री ११ वाजता २८.०५ वर पोहोचले होते.
फटाक्यांमुळे हवेतील प्रदूषकांचे प्रमाण कमाल मर्यादा पातळीपेक्षा जास्त आढळून आले आहे. हवेतील प्रदूषकांचे गंभीर परिणाम आरोग्यावर होतात. हे प्रदूषक फुफ्फुसांमध्ये जाऊन तेथून पुढे रक्तात मिसळतात. त्यानंतर ते शरीरातील अवयवांपर्यंत पोहोचून पेशी आणि ऊतींना हानी पोहोचवितात. हवा प्रदूषणामुळे हृदयविकाराच्या झटक्यासह ब्रेन स्ट्रोक, सीओपीडी, फुफ्फुसाचा कर्करोग यासह अनेक गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी मास्कचा वापर करावा, असा सल्ला ससून सर्वोपचार रुग्णालयातील श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. संजय गायकवाड यांनी दिला.